पुढारी ऑनलाईन डेस्क: मागील आठवड्यात काेल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. अवघ्या काही तासांमध्ये पंचगंगा नदीने इशारा पातळी आणि त्यानंतर धाेका पातळीही ओलांडली. एकीकडे नदीच्या पाणीपातळीत इंचा-इंचाने वाढ हाेत हाेती तर दुसरीकडे पुन्हा एकदा २०१९, २०२१ सारखं महापूराचे संकट ओढावणार, अशी टांगती तलवार काेल्हापूरकरांवर हाेती. राजाराम बंधारा पाणी पातळी शनिवारी (दि.२७ जुलै) ४७ फूट ८ इंच इतकी यंदाची उच्चतम पातळी गाठली. मात्र रविवारी (दि.२८ जुलै) पहाटे ६ वाजलेपासून पाणी पातळीत घट होण्यास सुरूवात झाली. मागील ७२ तासांत पंचगंगा पाणी पातळी ३ फूट १ इंच घट झालीआहे. सध्या राजाराम बंधारा येथील पाणी पातळी ४४ फूट ७ इंच इतकी आहे. पावसाने घेतलेली उसंती आणि नदीच्या पाणी पातळीत हाेणारी घट यामुळे काेल्हापूरकरांना माेठा दिलासा मिळाला आहे.
धरण क्षेत्र आणि संपूर्ण जिल्ह्यात पावसाने गेल्या ७२ तासांत उसंती घेतली असून, पंचगंगा नदी पाणी पातळीत संथगतीने घट होत आहे. अलमट्टीतूनही रविवारी (दि.२८ जुलै) सव्वातीन लाख क्यूसेक विसर्ग वाढवण्यात आला होता, परिणामी पंचगंगेच्या पाणी पातळीत हळूहळू घट सुरूच आहे.
पंचगंगेची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावर आज (३० जुलै) सकाळी ४४ फूट ७ इंच इतकी असून पंचगंगा धोका पातळी ओलांडून वाहत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७७ बंधारे अद्याप तरी पाण्याखाली आहेत. गेल्या २४ तासांत पंचगंगेच्या पाणी पातळीत पावणेदोन फूट घट झाली असल्याने 10 बंधारे खुले झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रविवारी सकाळी ६ वाजेपासून पंचगंगा पाणी पातळीत इंच-इंचाने घट होण्यास सुरूवात झाली. दरम्यान १ इंच पाणी पातळी घटल्यानंतर ४७ फूट ७ इंच झाली. त्यानंतर दुपारपर्यंत ३ इंचाने आणखी पाणी पातळी घटून ती ४७ फूट ४ इंच इतकी झाली. रविवारी दिवसभर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पंचगंगा पाणी पातळीत ९ इंचाने घट झाली. दरम्यान, राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा पाणी पातळी ४७.८ वरून ४६.९ इतकी झाली. तर सोमवारी दिवसभर १ फूट ८ इंचाची घट होऊन पंचगंगा पाणी पातळी ४६ फूट ९ इंचावरून ४५ फूट १ इंचावर पोहचली आहे.
आज मंगळवार (दि.३० जुलै) सकाळपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी ४ इंचाने घटली असून सध्या ती सकाळी १० वाजता ४४ फूट ७ इंच इतकी आहे. कोल्हापूर शहरात पावसाने जरी उसंती दिली असली, हळूहळू पाणी पातळीत जरी घट होत असली अद्यापतरी पंचगंगा धोका पातळी (४३ फूट)ओलांडूनच वाहत आहे.