मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा
राधानगरी निपाणी या महत्त्वाच्या राज्य मार्गावरून तब्बल आठ दिवसानंतर आज (मंगळवार) वाहतूक सुरू झाली. अद्यापही मुरगूड-निढोरी दरम्यान असणाऱ्या स्मशान शेडजवळ वेदगंगेच्या महापुराचे अर्धा फूट पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने वेदगंगा नदीच्या महापुराच्या पाणीपातळीमध्ये घट होत आहे.
23 जुलै पासून मुरगूड-निढोरी दरम्यान असणाऱ्या स्मशान शेडजवळ वेदंगेच्या महापुराचे पाणी आले होते. तब्बल आठ दिवस या ठिकाणी महापुराचे पाणी राहिल्याने वाहतूक बंद झाली होती. शिंदेवाडी यमगे दरम्यान रस्त्यावर पाणी आले होते. तिथून वाहणारे पाणी बंद झाले आहे.
महापुराच्या पाण्याची पातळी उतरण्याची प्रक्रिया संथ राहिली. त्यामुळे तब्बल आठ दिवस या ठिकाणी पाणी रस्त्यावर राहिले. अद्यापही पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पिके कुजली गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.