नृसिंहवाडी / पुढारी वृत्तसेवा
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे मध्यरात्री साडेबारानंतर येथे श्री दत्तगुरूंच्या उत्सवमूर्तीचे आज (रविवार) गावात आगमन झाले. श्रींच्या उत्सव मूर्तीच्या स्वागतासाठी मध्यरात्री ही भाविकांची अलोट गर्दी झाली होती. ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष, बँड पथकाच्या निनादात मठाच्या परिसरातील कृष्णामाईच्या पाण्यातून सवाद्य मिरवणूकीसह शेकडो भाविक व नागरिकांच्या दर्शनासाठी सुमारे तीन वर्षानंतर देव गावात आले. कृष्णा पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आणि टेंबे स्वामी मठातदेखील पाणी आल्याने श्रींची उत्सवमूर्ती मानकरी दिगंबर खातेदार पुजारी यांच्या निवासस्थानी आणण्यात आली आहे. यावेळी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. (Narsinhwadi)
डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. यावेळी मार्गावर अनेक सुवासिनींनी 'श्रीं'ना ओवळण्यासाठी गर्दी केली होती. पाणीपातळीत काल (शनिवार) दिवसभर संथ वाढ होत होती. त्यामुळे शुक्रवारी रात्री उत्सवमूर्ती नारायण स्वामी मंदिरातून टेंबे स्वामी मठात ठेवण्यात आली होती. देव कधी गावात येतात? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली असल्याने मंदिर परिसरात गर्दी वाढली होती. २०१९, २०२१ साली महापुराच्या काळातही श्रींच्या अखंड सेवेत खंड पडला नव्हता. परंपरेनुसार मानकरी दिगंबर खातेदार, उमेश खातेदार, नितीन खातेदार, आशिष खातेदार यांच्याकडे सेवेचा मान आल्याने त्यांच्या निवासस्थानी आज पासून नित्य उत्सवमूर्तीची काकड आरती महापूजा, कृष्णामाईची पूजा, शेजारती आदी विधी होणार आहेत.(Narsinhwadi)
दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असती तरी नृसिंहवाडीतील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून पेठ भाग, माहेश्वरी परिसर, योगीराज कॉलनी बाबर प्लॉट आदी ठिकाणातील कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
2019 व 2021 साली महापुरात नित्य-पूजा विधींसाठी देव गावात आले होते. तीन वर्षांनंतर उत्सवमूर्तीचे गावात आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. श्री दत्तगुरुराया महापुर येऊ नये पाणी पूर्ववत पात्रात जावे अशी प्रार्थना ही यावेळी सामुदायिकपणे करण्यात आली.