पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांत कोल्हापूरसह परिसरात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पंचगंगा पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरूच होती. पंचगंगा पाणी पातळीकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नदी पातळीत सातत्याने होणारी वाढ कोल्हापूरकरांचे टेन्शन वाढवत होती. मात्र आज सकाळी पाणी पातळीत 'अल्प' घट झाल्याने कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
रविवारी (दि.२८ जुलै) पहाटेपर्यंत ४७.८ इंच इतकी होती. सकाळी ६ वाजता १ इंचांनी पाणी पातळी कमी झाली. तर दुपारी १२ वाजेपर्यंत आणखी ४ इंचानी पाणी पातळीत घट झाली असून, दुपारी १२ वाजता ४७ फूट ४ इंच इतकी स्थिर झाली आहे. मागील सात दिवसांपासून सातत्याने पंचगंगेच्या पातळीत वाढ होत आहे. मात्र आज प्रथमच पंचगंगेच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या सात दिवसांहून सतत पावसाची मुसळधार सुरूच आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील वाढ सातत्याने सुरूच आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी ४ इंचाने कमी झाली आहे. शनिवारी (दि.२७ जुलै) जिल्ह्यातील एकूण ९५ बंधारे पाण्याखाली होते, मात्र आता ८७ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान आज सकाळपासून पावसाने देखील उघडीप दिल्याने पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे. परंतु अद्याप कोल्हापूरातील काही भागात पाणी साचलेले असल्याने पूराची भीती कायम आहे.
कृष्णा नदीवरील लालबहादूर शास्त्री जलाशय अर्थात अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग 25 हजार क्युसेकने वाढवण्यात आला असून तो आता सव्वातीन लाख क्यूसेकआहे. त्याशिवाय पाण्याचा एकूण साठा 65 टक्क्यावरून 58 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. आज (दि.28) सकाळी आठ वाजता जलाशयात पाण्याचा साठा 58.25 म्हणजेच 71.7 टीएमसी होता. अलमट्टी ची एकूण क्षमता 123 टीएमसी आहे.
पश्चिम घाटात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीसह पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा या सगळ्याच नद्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. परिणामी अलमट्टीत गेल्या दहा तासात सरासरी दोन लाख 54 हजार क्युसेक पाण्याची आवक झाली. या पाण्याच्या फुगवट्यामुळे येणारा संभाव्य पूर टाळण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. शनिवारी (दि.28) रात्रीपासूनच तो सव्वा तीन लाखवर करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी अलमट्टीत 65.49% पाणीसाठा होता. विसर्ग वाढवून तो आता कमी करण्यात आला आहे.
कोकणात २ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार असून, विदर्भातही २९ जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत मुसळधारेचा अंदाज आहे. मात्र, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागातील अतिवृष्टीचे रेड आणि ऑरेंज अलर्ट नाहीसे झाले असून, २ ऑगस्टपर्यंत कोकणात मुसळधारेचा अंदाज आहे. मात्र, हा पाऊसदेखील ६० ते ८० मि.मी. इतका राहील. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात मात्र २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत पुन्हा मुसळधारेचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात मध्यम, तर मराठवाड्यात या कालावधीत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
यलो अलर्ट : पालघर (२८), ठाणे (२७ ते २९), मुंबई (२७, २८), रायगड (२८ ते ३०), रत्नागिरी (२७ ते ३०), धुळे (२७), पुणे (२७ ते ३०), कोल्हापूर (२७, २८), सातारा (२८, २९), अकोला (२७ ते ३०), अमरावती (२७ ते ३०), भंडारा (२७ ते ३०), बुलडाणा (२७ ते ३०), चंद्रपूर (२७ ते ३०).