राशिवडे (कोल्हापूर); पुढारी वृतसेवा : येळवडे (ता.राधानगरी) येथील श्रीधर संभाजी राबाडे (वय १५) या शाळकरी मुलाचा भोगावती नदीमध्ये पाय घसरुन पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी एकच्या दरम्यान घडली. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून घटनास्थळी पो.नि.स्वाती गायकवाड यांनी भेट देऊन माहिती घेतली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, श्रीधर हा आपले वडील संभाजी याच्यासोबत कोदवडे येळवडे दरम्यानच्या पानंदी जवळील शेताकडे गेले होते. शेतीकाम आटोपुन श्रीधर हातपाय धुण्यासाठी दुपारी १ च्या दरम्यान नदीपात्रामध्ये गेला. यावेळी त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडला, त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा नदिपात्रामध्ये शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडला.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यासह त्यांचे सहकारी कृष्णात यादव, कृष्णात खामकर, अरविंद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. सोळांकुर आरोग्य केद्रामध्ये उत्तरिय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच नदीघाटावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
अधिक वाचा :