सिंधुदुर्ग : सह्याद्रीच्या कुशीत व अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला" सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसौंदर्य, पर्यटन आणि फळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आंबा, काजू, नारळ यांसह विशेषतः रातांबा (कोकम) फळाच्या उत्पादनासाठी हा जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात फळ बागायत लागवडीमध्ये आंबा काजू व नारळ या फळ झाडांचा बोलबालाअसला तरी रतांबा(कोकम) हे लाल रत्न नेहमीच आपले वेगळे स्थान बाजारपेठांमध्ये टिकवून आहे.
रातांबा फळाचा इतिहास
रातांबा हे मुळचे भारतातील विशेषतः कोकण परिसरातील स्थानिक फळ मानले जाते. हजारो वर्षापासून कोकमची झाडे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या ' किनारी भागात नैसर्गिकरीत्या वाढत आली आहेत. रातांब्याचे फळ फोडून त्याच्या सालीचे तूकडे केले जातात त्याला 'कोकम' किंवा 'सोल" असे म्हणतात. आयुर्वेदातही कोकमचा उल्लेख आढळतो त्यामुळे है फळ प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आणि आहाराचा भाग असल्याचे मानले जाते. आयुर्वेदात कोकमला अत्यंत उपयुक्त वनस्पती मानले गेले असून त्याचा उल्लेख वृक्षाम्ला' किंवा 'फलाम्ला या नावांनी आढळतो. कोकमाचे फळ गुणकारी मानले जाते. मधुर व आम्लरसयुक्त कोकम रूक्ष गुणधर्माचे असून पचण्यास जड असते. आयुर्वेदानुसार पचनानंतर त्याचे आम्ल पाचक रसामध्ये रूपांतर होते. कच्चे कोकम वात आणि पित्त दोष कमी करण्यास मदत करते, तर पिकलेले फळ कफ व वात दोषांचे शमन करते. भुक वाढवणे, अन्नाची चव वाढवणे तसेच मलनिर्मितीस सहाय्य करणे ही कोकमची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रातांबा लागवड
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकमची एकूण लागवड १३९९ हेक्टरवर आहे, त्यापैकी १२६४ हैक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. या क्षेत्रातून ३५.५ मे. टन हेक्टर उत्पन्न मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता एकूण मिळणारे उत्पन्न (फळे) अंदाजे ४४८७२ मे. टन आहे. सिधुदुर्ग जिल्ह्मात कोकम उत्पादनासाठी सावंतवाडी, मालवण, कुडाळ आणि वेंगुर्ले हे तालुके अग्रेसर आहेत. याशिवाय जिल्ह्मातील इतरही अनेक भागात कोकमचे उत्पादन घेतले जाते.
सुधारित जाती
कोकमची रोपांपासून लागवड केल्यास त्यामध्ये सुमारे ५० टक्के नर झाडेव ५० टक्के मादा झाडं निघतात. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या मृदुकाष्ट कलम पद्धतीचा वापर करून लागवड केली जाते. परंतु त्यामध्ये १० टक्के नर झाडे असणे आवश्यक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषीविद्यापीठ, दापोली मार्फत विकसित जातींमध्ये कोकण अमृता, कोकण हातीस यांचा समावेश आहे. यांपासून मिळणारी फळे जाड सालीची व आकर्षक लाल रंगाची असतात. प्रति झाड १४० ते १५० किलो फळे मिळतात. सर्वसाधारणपणे लागवडीपासून सहा वर्षानंतर फळे धरण्यास सुरुवात होते.
कोकम प्रक्रिया उद्योग
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कोकमाला भारत सरकारकडून 'भौगोलिक मानांकन' प्राप्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रातांबे (कोकम) प्रक्रिया उद्योग हा एक अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर कृषी-आधारित व्यवसाय आहे. कुडाळ, सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यामध्ये लघु उद्योग,बचत गट आणि व्यावसायिक यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करतात. रातांब्यापासून कोकम आगुळ, कोकम सरबत /सिरप, सुके सोल, सोलाकढी, कोकम कँडी व कोकम बटर (मालवणी भाषेत याला 'मुटियाल" म्हणतात ) असे विविध उत्पादने बनवता येतात. रतांब्याच्या बियांपासून प्रक्रिया करून मुटीयाल म्हणजेच कोकम बटर बनवले जाते. कोकम बटरची सौंदर्यप्रसाधन, औषधी आणि खाद्य उद्योगात मोठी मागणी आहे. विशेषतः नैसर्गिक आणि ऑर्गेनिक उत्पादनांच्या वाढत्या ट्रैंडमुळे भारतासह परदेशातही याची मागणी वाढत आहे. मुंबई, पुणे, गोवा, बेंगळुरू येथील कॉस्मेटिक कंपन्यांकडून कोकम बटरला मोठी मागणी आहे.
कोकम लागवड काळाची गरज
बहुतांश शेतकरी फक्त आंबा, काजु व नारळ या फळांचाच लागवडीकरिता विचार करत असून त्यांच्या येवढेच किंबहुना त्याहून अधिक उत्पन्न देण्याचे सामर्थ्य रातांबा-कोकम या फळात आहे.रातांबा फळाच्या झाडाची लागवड अपेक्षित प्रमाणात होत नाही. सद्या उपलब्ध होत असलेला रतांबा हा मुख्यतवे पूर्वापार असलेल्या जुन्या नैसर्गिक रित्या उगवलेल्या झाडांपासूनच होतो. बऱ्याच ठिकाणी ही झाडे वनराईमध्ये आहेत. या वनराईंमध्ये पूर्वी लोक गुरे चरवण्यासाठी नेत असत व त्यामुळे तेथील पायवाटा, झाडेझुडपे यांची तोड होत असल्याने शेतकऱ्यांचा तिथे वावर होता. परंतु गेली बरीच वर्षे गावातील गुरे कमी झाल्यामूळे व पायवाटांची व जंगलातील झाडांची सफाई होत नसल्याकारणाने शेतकऱ्यांचा तेथील वावर कमी झाला परिणामी जंगलातील रातांबा झाडांपासून मिळत असलेला कच्चा माल घटला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रातांब्याच्या झाडांची लागवड करणे आवश्यक आहे.
यंदा चांगले उत्पादन मिळण्याची संभाव्यता
रातांबावर आधारित अनेक प्रक्रिया उद्योग आहेत परंतू कच्च्या मालाच्या पूर्ततेअभावी ते ग्राहकांच्या वाढत्या मागणीस पुरवठा करण्यास आकार्यक्षम ठरत आहेत. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस व प्रातिकूल हवामान यामुळे कोकम उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परिणामी कोकम, सोल आणि आगुळ यांची प्रचंड मागणी असूनही त्याचा पुरठा होत नव्हता. मात्र यंदाच्या वर्षी चांगले उत्पादन मिळण्याची संभाव्यता दर्शवली जात आहे.
कोकम लागवडीला बळ मिळणे आवश्यक
शेतकरी कोकम पिकाबद्दल जागरूक होण्यासाठी प्रशासनाने विविध उपक्रम राभवणे गरजेचे आहे. पालघर जिल्ह्यात होणारा चिकु महोत्सव, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा आंबा महोत्सव ई. प्रमाणे कोकम महोत्सव देखील होणे गरजचे आहे. प्रशासनाकडून रातांबा लागवड, प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. रातांबा फळापासून उत्पन्न घेऊनच कोकणातील शेतकरी आर्थिक प्रगती साधू शकतो.