

नाशिक : विकास गामणे
महाराष्ट्राचे कांद्याचे आगर आणि आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याबाबत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने उन्हाळ कांद्याचे लागवड क्षेत्र वाढवले खरे, मात्र सुरुवातीला अवकाळी पाऊस, नंतर थंडीचा अभाव आणि ऐन काढणीच्या वेळी झालेली गारपीट व चाळिशी पार गेलेल्या तापमानामुळे कांदा पिकाचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
उत्पादन खर्चही निघणे अशक्य झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. दोन - तीन वर्षांपासून कांद्याच्या भावात पडझड होत असली तरी, कांदा लागवडीचे क्षेत्र वाढतच आहे.
जिल्ह्यात साधारण खरीप, लेट खरीप व उन्हाळी कांद्याची लागवड होते. हे तिन्ही मिळून साधारणपणे ७५ हजार ते दोन लाख हेक्टरवर कांद्याचे क्षेत्र असते. मात्र, यात दरवर्षी सातत्याने वाढ होताना दिसत आहे. २०२४-२५ या वर्षात विक्रमी ३ लाख ५७हजार २५३ हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. ही लागवड २०२३-२४ या वर्षीच्या तुलनेत १ लाख हेक्टरने (सरासरी ३० टक्के) वाढली होती. मात्र, यंदा २०२५-२६ या आर्थिक वर्षात कांदा लागवडीचे क्षेत्र घटले.
यंदा अतिवृष्टीने कांदा रोपांचे झालेले नुकसान, अवकाळीने रोपाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख २५ हजार ७६९ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली. गतवर्षी जिल्ह्यात २ लाख ५१ हजार ४५९ हेक्टर कांदा लागवड झाली होती. यंदा यात २५ हजार ६८९ हेक्टरने घट झाली.
असे असतानाच मार्चमध्ये अवकाळीने थैमान घालत गारांचा पाऊस झाला. याचा फटका कांदा पिकाला सर्वाधिक बसला. हे संकट संपत नाही तोच जिल्ह्यात उन्हाने कहर केला. मार्च व एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा ४० अंशांवर पोहोचला. याचा परिणाम कांदावाढीवर झाला. कांद्याला आकार येत असतानाच हे संकट कोसळले. त्यामुळे कांद्याची आकारमानता कमी होऊन उत्पादकता कमी झाली. कांद्याला भाव कांद्याची नसतानाच उत्पादकता घटल्याने शेतकरी आणखी संकटात सापडला.
उत्पादकता कमी होण्याची कारणे
१. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परतीच्या व अवकाळीमुळे कांद्याच्या रोपवाटिका ६० ते ७० टक्क्यांपर्यंत सडून गेल्या. यामुळे शेतकऱ्यांना महागडी बियाणे आणून रोपे तयार करावी लागली. परिणामी, जी लागवड डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होते, ती थेट फेब्रुवारी महिन्यापर्यंत लांबली.
२. कांद्याची पात जोमदार येण्यासाठी आणि जमिनीत कांद्याचा पोस मोठा होण्यासाठी सुरुवातीच्या ६० ते ७० दिवसांत मध्यम ते कडक थंडीची आवश्यकता असते. मात्र, यंदा जिल्ह्यात म्हणावी तशी थंडी पडलीच नाही. हवामान उबदार राहिल्याने झाडाची वाढ खुंटली.
३. लांबलेल्या लागवडीमुळे कांदा गड्डी धरण्याच्या अवस्थेत असतानाच एप्रिल-मे महिन्यात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला. या उष्णतेमुळे कांदा नैसर्गिकरीत्या वाढण्याऐवजी वेळेपूर्वीच पक्का झाला. यामुळे कांद्याला अपेक्षित आकार आला नाही. त्याचे वजन घटल्याने गुणवत्ता खालावली.
४. ऐन काढणीच्या काळात मार्चमध्ये वादळी वारा आणि गारपिटीने कसमादे पट्ट्याला झोडपून काढले. शेतात काढून ठेवलेला आणि काढणीला आलेला कांदा पाण्यात साचल्यामुळे शेतातच सडू लागला.