माखजन : गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ रेंगाळलेल्या पूर्वीच्या मुंबई-गोवा महामार्ग व आताचा पनवेल-कन्याकुमारी या महामार्गाला जणू ग्रहण लागल्याची स्थिती आहे. गेली अनेक वर्षे लोकार्पणच्या प्रतीक्षेत असलेल्या या महामार्गाची सतत तोडफोड करून डागडुजी करावी लागत आहे. एकीकडे अपूर्ण काम आणि दुसरीकडे खराब होत चाललेला रस्ता यामुळे प्रवासी व वाहन चालक पुरते कंटाळले आहेत.
पनवेल ते कन्याकुमारी हा १४४० कि.मी. इतक्या लांबीचा अध्याप पूर्ण झालेला नसून समस्यांनी ग्रासला आहे. पनवेलहून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, केरळ अशा महत्त्वाच्या ठिकाणाहून तामिळनाडूतील कन्याकुमारीत संपतो. केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सध्या ग्रहण लागलेले पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे, रस्त्याची कामे अपूर्ण आहेत; पण पूर्ण कामेखील पुन्हा खोदाई करून पुन्हा काँक्रिटीकरण करावे लागते, ही गंभीर बाब आहे. यामुळे रस्ता बांधकामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित होत आहे.
सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्थेेंजीक रस्ता खचला होता. भेगा पडल्या होत्या. अनेकदा मलमपट्टी करण्यात आली होती; परंतु अखेर काँक्रीट फोडून पुन्हा काँक्रिटीकरण करण्याची वेळ आली असून सध्या काम सुरू आहे. जनतेची फसवणूक होत असलेल्या या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.
संगमेश्वर ते चिपळूण भागात रस्त्यावर असंख्य ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याला भेगा पडल्या आहेत. वाहने आपटत आहेत. काही ठिकाणी काँक्रीट निघून गेल्याने रस्ता खडबडीत झाला आहे. हे सार प्रवासी, वाहन चालक निमूटपणे सहन करत आहेत. या सगळ्या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
चिपळूणच्या उड्डाणपुलावरून यावर्षी तरी वाहने जातील, असे वाटले होते; परंतु चिपळूणकरांचा भ्रमनिरास झाला आहे. उड्डाणपूल पूर्ण होईपर्यंत चिपळूणकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, भेगा या तत्काळ बुजवण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. याकडेही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.