अहमदनगर

नेवासा : मुळातून आवर्तन सोडा; अन्यथा जलसमाधी

अमृता चौगुले

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडावे अन्यथा शेतकर्‍यांसह मुळा धरणात जलसमाधी घेवून आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा निवेदन नेवासा काँग्रेसने मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. पावसाळा सुरू होवून तीन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यातील शेतकरी हैराण झाला आहे. खरिपात केलेल्या सोयाबीन, कापूस, अन्य पिकांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे.

शेतकर्‍यांनी कर्ज काढून घेतलेली पिके शेवटची घटका मोजत आहेत. तर, दुबार पेरणीचे संकट पुढे आहे. मोठे नुकसान होवूनही अजून पंचनामा शब्द कोणी उच्चारत नाही. शेतकरी संकटात सापडला असून, जर मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडल्यास ही पिके काही प्रमाणात वाचवू शकतात. सद्य परिस्थितीत मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशीच अपेक्षा शेतकर्‍यांना दिसत आहे.

सोमवारी नेवासा तालुका काँग्रेस कमिटी व शेतकर्‍यांनी नगरच्या मुळा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट घेऊन मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी केली. येत्या आठवडा भरात पाणी सोडले नाही, तर शेतकर्‍यांसह मुळा धरणात जलसमाधी घेणार, असे निवेदन म्हंटले आहे.

यावेळी नेवासा शहराध्यक्ष अंजुम पटेल, जिल्हा काँग्रेसचे संदीप मोटे, उपाध्यक्ष सतीश तर्‍हाळ, मुसा बागवान, द्वारकणाथ जाधव, किरण साठे, दिलीप पवार, नंदु कांबळे, गोरक्षनाथ काळे, संजय होडगर, मोहन भवाळ, महिला काँग्रेसच्या शोभा पातारे, मीरा वडागळे, राणी भोसले, ज्योती भोसले, संगीता चांदणे आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता पाटील यांनी लवकरच मुळा धरणातून शेतीसाठी चार टीएमसी आवर्तन सोडण्यात येईल, असे स्पष्ट केले.

'शेतकर्‍यांचे हाल नेत्यांना दिसेनात'

काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे म्हणाले, राजकीय पक्षातील नेत्यांना फक्त सत्ता कशी मिळेल, कोणासोबत जायचे, किती खोके मिळतील हेच दिसते; परंतु दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांचे काय हाल आहेत हे मात्र दिसेना. आज कोरडा दुष्काळ जाहिर करण्याची वेळ आली असताना कोणीही बोलायला तयार नाही, ही मोठी खंत असल्याचे त्यांनी म्हंटले.

'पाणी सोडले नाही तर जलसमाधी घेईल'

जिल्हा काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा शेतकरी व कामगाराचा पक्ष असून त्यांच्या पाठीशी कायम आहे. आज शेतकर्‍यांवर मोठे संकट आले असून, त्यामुळे दोन तीन दिवसात पाणी सोडले नाही तर शेतकर्‍यांसह मीही जलसमाधी घेईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT