अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राहुरी, संगमनेर परिसरात पिकअप व भंगार साहित्य चोरी करणार्या पाच आरोपींच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सात लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जैद मुश्ताक सय्यद, उमर बशीर शेख (दोघे रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), मुजम्मिल मन्सूर शेख (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर), नजीर रज्जाक सय्यद (रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी), सोहेल इब्राहिम पठाण (रा. नांदुर रोड, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत.
राहुरी फॅक्टरी येथून एक पिकअप वाहन भरधाव वेगाने राहुरीच्या दिशेने जाताना गस्तीवर असलेल्या एलसीबीच्या पथकाने पाठलाग करून पिकअप अडविला. वाहनाची कागदपत्रे व भंगाराची विचारपूस केली असता, आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी पिकअप संगमनेर तर, वाहनातील भंगार देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथून चोरी केल्याची कबुली दिली.
राहुरी येथून चोरी केलेले सहा लाख 40 हजार रुपये किंमतीचे एक हजार 600 किलो भंगार सामान व संगमनेर येथील चोरीचा दीड लाखाचा पिकअप पोलिसांनी जप्त केला. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, रणजीत जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ यांनी कारवाई केली.
हेही वाचा