रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील जगन्नाथबाबा दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात झाले. ग्रामस्थांनी रथाचे पूजन करून वारकर्यांना निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गावातील सर्व मंदिरांचा अभिषेक घालून दिंडीचे प्रस्थान ठेवले. नगर-सोलापूर मार्गावरून जवळपास 800 दिंड्या जातात. यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.
या मार्गावर खानदेश, नाशिक, मराठवाडा परिसरातील सर्व वारकरी या मार्गाने पंढरीकडे रवाना होतात. या मार्गावर कोणताही घाट नाही, तसेच मोठी गावे असल्याने वारकरी याच मार्गाने जाणे पसंद करतात. संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, गंगागिरी महाराज, साईबाबा, महिपती महाराज, अशा मानाच्या दिंड्या या मार्गावरू जातात. हरिनामाचा गजर करताना पंढरपूरात वारकरी कसा पोहोचतो हेही कळत नाही.
आपापल्या भागातील वारकर्यांची काळजी घेण्यासाठी त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी मार्गावर येऊन वारकर्यांची विचारपूस करतात. पंढरपूरात जमा होणारे वारकरी मराठवाडा अन् खानदेशातील जास्त असतात. पुणे-सोलापूर आणि नगर-सोलापूर मार्गावरून जाणार्या भाविकांची संख्या जास्त असल्याने नगर, पुणे जिल्ह्यातील भाविकांचीही पंढरीत गर्दी होते. रुईछत्तीशी येथे अनेक वारकर्यांचा मुक्काम असतो. खानदेश आणि मराठवाड्यातील वारकर्यांना हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने येथून भाविकांची उत्तरार्ध वारी सुरू होते. रुईछत्तीशी येथील जगन्नाथबाबा दिंडी सोहळा पुढे जाऊन भक्तीमय वातावरण निर्माण करतो.
हेही वाचा