मुंबई; पुढारी ऑनलाईन : औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या निर्णयावर शिंदे सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देऊन शिंदे सरकारने पुन्हा दोन्ही शहरांच्या नामांतराचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. याची माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अल्पमतातील सरकारने नामांतराचा निर्णय घेतला होता. कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आधी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देऊन बहुमतातील सरकारने नव्याने नामांतराचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भूमीपुत्रांच्या मागणीनुसार नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्व असते. बहुमत असलेल्या मंत्रिमंडळाने हे निर्णय घेतले असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
विधिमंडळ हा ठराव मंजूर करेल आणि केंद्राकडे पाठपुरावा करुन तो मंजूर करुन घेऊ, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
उद्धव ठाकरे सरकारने आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे या बैठकीत निश्चित केले होते. या निर्णयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे पत्र दिल्यानंतर घेण्यात आलेली ही मंत्रिमंडळ बैठकच बेकायदेशीर असून हे निर्णय रद्द करून नव्याने मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
औरंगाबाद शहराच्या नामकरणाची पहिली मागणी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी चौतीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८८ साली केली होती. एप्रिल १९८८ मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली, त्यात शिवसेनेचे ६० पैकी तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. या विजयानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मे १९८८ मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली. तेव्हापासून शिवसेनेचे पदाधिकारी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात.