मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसलेल सरकार आहे. सरकारला लोकांचा पाठिंबा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. आज (दि.८) विधानभवनात विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी सरकारवर टिका केली.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील जनमत शिंदे सरकारला पाठिंबा देत नाही. मुख्यमंत्र्यांच्या वरळी येथील सभेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात ते बोलत असताना खुर्चीवर माणसेच नाहीत. यातून आज काय परिस्थिती आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्रापुढे आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाली, यावर बोलताना ते म्हणाले, शिंदे गटाच्या आमदारांनी अशा थराला पोहचायला नको, हे दुर्दैवी आहे. त्यांच्या आमदारांना डोळ्यासमोर पराभव दिसू लागल्याने त्यांनी ही कृती केली आहे. आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारसंघात आले याची भीती बंडखोर आमदारांच्या मनात असल्यामुळे दहशत पसरवणे, दगडफेक करणे असे प्रकार केले, असा आरोप पाटील यांनी केला आहे. दरम्यान, रत्नागिरीत पत्रकारावर गाडी घालून चिरडून मारल्याच्या घटनेचा त्यांनी निषेध केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नेहमी पाच आठवड्यांचे असते मात्र या अधिवेशनात फक्त १७ दिवसांचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनामध्ये सदस्यांना अधिक चर्चा करता यावी, असा ठराव आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :