पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकिया ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय हॉकी संघाने मागील ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अर्जेटिनाचा पराभव केला. सामन्यात अखेरच्या तीन मिनिटांमध्ये दोन गोल करत भारताने हा सामना ३-१ असा जिंकला. या कामगिरीमुळे भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे.
साखळी फेरीतील सामन्यात भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला हाेता. यानंतर स्पेन विरुद्धचा सामना जिंकला होता. यानंतर अर्जेटिनाबरोबरील सामना खूप महत्त्वपूर्ण होता.
२०१६मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये अर्जेटिनाने सुवर्णपदक जिंकले होते. या बलाढ्य संघाचे मोठे आव्हान भारतीय हॉकी संघासमोर होते. या सामन्यातील विजयावरच पुढील प्रवास निश्चित होणार होता.
आज विजयाच्या निर्धाराने हॉकी संघ मैदानात उतरला. दोन्ही संघानी उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले.
सामन्यात वरुण कुमारने ४३व्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले.
अर्जेटिनाने ४८व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात बरोबरी साधली.
या नंतर दडपणातही भारतीय संघाचा खेळ बहरला.
विवेक सागर प्रसादने ५८ व हरमनप्रीत सिंहने ५९वा मिनिटांला गोल करत सामना भारताच्या नावावर केला.
भारताने ३-१ने सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
आजच्या सामन्यात युवा खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट खेळीमुळे हॉकीमधील पदकाची आशा कायम राहिली आहे.