गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : निसर्गाच्या अवकृपेने राज्यभरातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. शिंदे- फडणवीस सरकार पीकविमा कंपन्यांशी मिलीभगत करत असल्याने शेतकऱ्यांना ठोस मदत मिळत नाही. राज्य सरकारच्या या शेतकरीविरोधातील भूमिकेविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रेल्वे उड्डाणपूलावर सरकार विरोधी आक्रमक घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे जिल्हा शासकीय यंत्रणेने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला. सुमारे दोन तास सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्हा युवा अधिकारी अर्जुन सामाले, उपजिल्हाप्रमुख ॲड. मनोज काकाणी, विधानसभा अध्यक्ष राम लटके, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, शहरप्रमुख जितेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार सुनील कांबळे यांना याप्रकरणी निवेदन देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला.
या आंदोलनात संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष धोंडीराम जाधव, सुभाषराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष राम लटके, शहर संघटक ॲड.राजू देशमुख, भास्कर काळे, प्रविण काबरा, गोविंद अय्या, राजेभाऊ बडवणे, उप तालुकाप्रमुख रामकिशन शिंदे, जानकीराम पवार, गोविंद जाधव, उपशहरप्रमुख रजत गायकवाड, युवासेना शहर युवा अधिकारी गोविंद जाधव आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.