काबूल;पुढारी ऑनलाईन: सत्ता काबीज केल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील जनतेला वेठीस धरले आहे. काबूलमध्ये निर्दयी कृत्य करत तालिबान्यांचा धुमाकूळ सुरु आहे. अशातच काबूल विमानतळ परिसरामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळ परिसरात जमलेल्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पाणी आणि अन्नासाठी ते तळमळ आहेत. याचाच फायदा घेत या नागरिकांची लूट सुरु आहे.
तालिबान्यांनी अफगाणावर कब्जा केल्यानंतर हजारो नागरिकांनी देश सोडण्यासाठी विमानतळाकडे धाव घेतली. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ माजला आहे. तालिबान्यांनीही काबूलमध्ये क्रूरतेचे नवे चित्र रोज समोर येत आहे. भविष्यात होणार्या भयावह छळाच्या भीतीने देशातील जनता घरासह सर्व सामान सोडून देश साेडण्यासाठी विमानतळावर गर्दी करीत आहेत.
एका रिर्पाटनुसार, काबूल विमानतळावरील परिस्थिती अत्यंत विदारक आहे. येथे सर्वसामान्य नागरिकांना पाणी व अन्नासाठी तळमळत आहेत. शेकडो नागरिकांची उपासमार सुरु आहे. काबूल विमानतळावर एक पाण्याची बाटली तीन हजार रुपयांना (४० डॉलर) तर राईस प्लेटसाठी तब्बल साडेसात हजार रुपये (100 डॉलर) मोजावे लागत आहेत.
विमानतळावर कोणतीही वस्तु खरेदी करायची असेल तर अफगाणिस्तानचे अधिकृत चलनही तालिबानी घेत नाहीत. केवळ डॉलर असणार्यांनाच खरेदी करता येत आहे. यामुळे केवळ अफगाणिस्तानचे चलन असणार्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. देश सोडून जाता येत नाही आणि कोणतीही वस्तू खरेदी करता येत नाही, अशा भीषण संकटात ते सापडले आहे. डॉलर असणार्यांकडूनही तालिबान्यांची लूट सुरु आहे.
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या विदेशी नागरिकांबरोबर स्थानिक नागरिक विमानतळाबाहेरील रांगेमध्ये उपाशी उभे आहेत. यामध्ये सर्वाधिक हाल हे लहान मुलांचे होत आहेत. उपासमारीमुळे काही मुले बेशुद्ध पडत आहेत. आता नागरिक हतबल झाले आहेत. काबूल विमानतळाबाहेर तब्बल ५० हजारांहून अधिक नागरिकांची गर्दी आहे. प्रचंड गर्दीमुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. या गर्दीमुळे विमानतळावर पोहचणेही अशक्य झाले असल्याचे या रिर्पाटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या संख्येने नागरिक जमले आहेत. विमानतळा बाहेरील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. देश सोडण्याची परवानगी मिळालेले नागरिकांनाच विमानतळवर जाण्याची परवानगी आहे. तर विमानतळा बाहेरील नागरिकांनी चिंतेने ग्रासले आहे. प्रचंड गर्दीमध्ये आता कोरोनाचेही नाही तर तालिबान्यांची दहशत आहे, असेही या रिर्पाटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचलं का ?