पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढचे दोन दिवस म्हणजे २५ एप्रिल आणि २६ एप्रिलला विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी गारपीट (Hailstorm) होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या मध्य महाराष्ट्रातील काही भागांत देखील गारपीट (Weather Alert) होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलला मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद आणि विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा या जिल्हयात गारपीटीची शक्यता (Weather Alert) आहे. २६ एप्रिलला पश्चिम महाराष्टातील पुणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ गारपीटीची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील उर्वरित जिल्ह्यात शुक्रवार २८ एप्रिलपर्यंत (Weather Alert) यलो अलर्ट असून, वादळी वारा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. २६ एप्रिलला कोकण आणि गोव्यात देखील वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला असून, उत्तर भारतात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, रांची ते मदुराईपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात कोकण वगळता सर्वत्र अवकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचे चित्र आहे.