पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन अशी चर्चा सुरू असताना आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ सिंगे यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करणाऱ्या आशयाच पत्र शेअर करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. (Vijay Wadettiwar)
विजय वडेट्टीवार यांनी दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र शेअर करत एक पोस्ट आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,
"महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही. त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. लाठीमारानंतर जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात 'क्रिम पोस्ट'वर बदली मिळाली.
मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन अशी चर्चा सुरू असताना आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कामकाजाबाबतची माहिती पत्रांवर पत्रे लिहिल्यानंतर मिळत नाही, केसरकरांचे हे पत्र मात्र लगेच सार्वजनिक होते. हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्याने रडल्यासारखे करायचे, असाच आहे. महायुतीचे सरकार हे जनतेला मूर्ख बनवू पाहणारे हेराफेरी सरकार आहे."