पुढारी ऑनलाईन डेस्क: चक्रीय वार्याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील पूर्व, ईशान्य, पश्चिम आणि दक्षिण भारतासह राज्यांमधील अनेक जिल्हयात अवकाळी पाऊस (Unsessional Rain) पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ६ एप्रिल ते ९ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांना अवकाळी पावसाचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांना ६ एप्रिलला यलो अलर्ट (Unsessional Rain) देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटांसह वादळी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची अधिक शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेडला ७ एप्रिलला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाटांसह पाऊस पडण्याची अधिक शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
८ एप्रिलला उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड वगळता उर्वरित राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. ९ एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही प्रमाणात अवकाळीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सची परिस्थिती निर्माण झाल्याने, मध्य छत्तीसगढच्या प्रदेशातून दक्षिण तमिळनाडूकडे सातत्याने वारे वाहत आहेत. बांग्लादेशच्या ईशान्य भागात आणि राजस्थानच्या नैऋत्येकडील भागात चक्रिय वादळांची निर्मिती होत असल्याने देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील ३ दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेशात वादळी वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होईल. पुढील २४ तासांत पूर्व अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य आसाममध्ये गारपीट होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.