टोकियो ऑलिम्पिक ( Tokyo Olympics ) मध्ये भारताचे स्टार शूटर मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी पुन्हा निराशा केली. १० मिटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. या दोन युवा शूटरवर चांगली कामगिरी करुन पदक जिंकण्याच्या अपेक्षांचा दबाव आहे.
मनू भाकर आणि सौरभ चौधरी दुसऱ्या पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिले. त्यांनी पहिल्या टप्यात ५८२ गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले होते. पण, दुसऱ्या फेरीत त्यांनी निराशा केली. दुसऱ्या फेजमध्ये टॉप आठ संघांत सामना झाला. या मिश्र जोडीला दुसऱ्या फेरीत फक्त ३८० गुणच मिळवता आले.
मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली असलेल्या मनू भाकरने दोन्ही फेऱ्यात निराशा केली. पहिल्या फेरीत तिला ९२ गुणच मिळवता आले. तर दुसऱ्या फेरीत तिला ९४ गुणांवर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे दुसऱ्या पात्रता फेरीत सौरभ चौधरीचीही सुरुवात निराशाजनक झाली. त्याला ९६ गुणच मिळवता आली. त्यानंतर त्याने पुनगारमन करत ९८ गुण मिळवले.
याचबरोबर भारताचे इतर शूटर सांघिक प्रकारात पात्रता फेरीतच गारद झाले. अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंग देसवाल हे पहिल्या पात्रता फेरीत १७ व्या स्थानावर राहिले. त्यांना सहा फेऱ्यांअखेरीस ५६४ गुण मिळवता आले.
भारताच्या शूटर्सकडून यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympics ) मोठ्या अपेक्षा आहेत. जागतिक शूटिंग वर्ल्डकपमध्ये भारताने दैदिप्यमान कामगिरी केली होती. याचबरोबर शूटिंगमध्ये भारताचे सर्वाधिक खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र झाले होते.
पाहा व्हिडिओ : कोयना धरणातून पडणारे पाणी लाल का आहे?