डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : एक वर्षापूर्वी दिलेले पैसे परत देत नसल्याने रेल्वेत मॅकेनिक असलेल्या अजय जाधव यांनी अतुल व्यापारी यांना माटुंगा येथील रेल्वे कॉलनीतील घरात डांबून ठेवत त्यांच्या पत्नीकडून ५ लाख रुपये मागितल्याचा प्रकार डोंबिवली येथे घडला आहे. खंडणीचे हे पैसे स्वीकारत असताना टिळक नगर पोलीस ठाण्याने अजय जाधव यांना रंगेहाथ पकडले.
डोंबिवलीत राहणारे अतुल व्यापारी हे बँकेतून कर्ज पास करून देणे, व्याजाने पैसे देने यांसारखे व्यवहार करतात. रेल्वेमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या अजयने २०२१ मध्ये अतुल जाधव यांच्यासोबत एक व्यवहार केला होता. त्यासाठी २ लाख ८० हजार रुपये त्याने अतुलला दिले होते. मात्र, पैसे परत देत नसल्याने अजयने अतुलला ९ जुलै रोजी भेटण्यासाठी बोलावून घेतले. भेटण्यासाठी गेलेल्या अतुलला त्यांनी मारहाण करत माटुंगा येथील रेल्वे वसाहतीतील घरात डांबून ठेवले.
त्यानंतर अतुल यांची पत्नी ऋचा यांना फोन करून नवरा हवा असेल तर ५ लाख रुपये द्या अशी मागणी केली. त्यांनतर ऋचा यांनी मला ५ लाख रुपये देणे लगेच शक्य नसून तीन लाख रुपये देते असे सांगितले. मात्र, अजय जाधव ५ लाख रूपयेच हले असल्याचे सांगत होते. त्यांनतर हे प्रकरण वेगळेच असल्याचे ऋचा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात पतीचे अपहरण केले असल्याची तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे, पोलीस नाईक जाधव, घुगे, महाजन, चंदने यांच्या पथकाने अतुल यांचा शोध सुरू केला. ऋचा यांनी ५ लाख घेण्यासाठी अजयला डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. या हॉटेलात पोलिसांनी सापळा लावत अजयला ताब्यात घेतले. यानंतर रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अजयला २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पिठे यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?