नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सवर जाईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फिक्की संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना शुक्रवारी व्यक्त केला. विकासाला चालना देतानाच रोजगार निर्मिती करण्यावर सरकारचा भर असल्याची टिप्पणीही गडकरी यांनी केली.
सर्वांगीण विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकार विविध स्वरुपाच्या योजना राबवित आहे, असे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आगामी काळात निर्यात वाढणे आणि आयात कमी होणे आवश्यक आहे. पर्यायी इंधन क्षेत्रात सरकार व्यापक प्रमाणात काम करीत आहे. जैव इथेनॉल, जैव सीएनजी, जैव एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यासारख्या पर्यायी इंधनाला सरकार चालना देत आहे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातले महत्वपूर्ण इंधन राहणार आहे.
देशाच्या वाहन उद्योगाचा सध्याची उलाढाल साडेसात लाख कोटी रुपयांची असून भविष्यात ही उलाढाल 15 लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वाहन उद्योगात रोजगाराची अमर्याद संधी आहे. हा उद्योग वाढला तर साहजिकच मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देखील मिळेल. दुसरीकडे बांधकामाचा खर्च कमी करण्याच्या योजनांवर सरकार काम करीत आहे. त्या दृष्टीने पोलाद आणि सिमेंटचा वापर कसा कमी होईल, याच्या पयार्यावर प्रयत्न सुरु आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?