Latest

Pune news : जवळपास 48 तासांनी सापडला त्या तरुणाचा मृतदेह

अमृता चौगुले

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा :  कवठे येमाई (ता. शिरूर) येथील माळीवस्ती – इनामवस्ती परिसरातील खार ओढ्यात पाय घसरून पडल्याने बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल 48 तासांनंतर सापडला. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता घडली. राजेंद्र विक्रम कोळी (वय 25) असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. राजेंद्र विजेचे खांब उभे करण्याचे काम करीत होता. पावसामुळे रविवारी काम बंद होते. राजेंद्र व त्याचा एक साथीदार ओढ्यावर गेले असता राजेंद्र पाय घसरून ओढ्यात पडला. तो पडला तेथेच कपारीत त्याचा मृतदेह आढळला.

संबंधित बातम्या :  

महसूल, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांसह रविवारी शोध मोहीम राबविली. मात्र, राजेंद्रचा शोध लागला नाही. मंगळवारी (दि. 26) सकाळी ओढ्याचे पाणी कमी झाल्याने पोलिस पाटील गणेश पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कपारीत मृतदेह अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. या वेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे पथक शोधकार्यासाठी हजर झाले होते. त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विनोद शिंदे, विष्णू दहिफळे यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शिरूर येथे पाठविला.

SCROLL FOR NEXT