Latest

T20 World Cup Points Table : बांगलादेशच्या विजयाने रोहित ब्रिगेडचे नुकसान! टीम इंडियाची गुणतालिकेत घसरण

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup Points Table : टी 20 विश्वचषक स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने नेदरलँड्सचा पराभव केला. होबार्ट येथे खेळल्या गेलेला हा सामना रोमहर्षक झाला आणि बांगलादेशने हा सामना अवघ्या 9 धावांनी जिंकला. या स्पर्धेतील बांगलादेशचा हा पहिलाच सामना होता. त्याच वेळी, नेदरलँडचा संघ पात्रता फेरीतून सुपर 12 मध्ये पोहोचला आहे.

दरम्यान, काल (दि. 23) टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवून सुपर 12 च्या गट-2 मध्ये अव्वल स्थान पटकावले. या गटात टीम इंडियासह, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत. पण गट 2 च्या दुसऱ्या सामन्यात आज (दि. 24) बांगलादेशने नेदरलँड्सवर विजय मिळवल्याने गुणतालिकेत भारताचे नुकसान झाले आहे. (t20 world cup points table big change in group 2)

गट 2 बद्दल चर्चा करायची झाल्यास; फक्त भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्सचे सामने झाले आहेत. गटातील तिसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात सोमवारी खेळला जाणार आहे. पण पावसामुळे हा सामना नियोजित वेळेत सुरू झाला नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवला तर ते गट-2 मध्ये अव्वल स्थानावर येऊ शकतात. मात्र सध्या बांगलादेशने नेदरलँड्सचा पराभव करून अव्वल स्थान पटकावले असून भारतीय संघाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. (t20 world cup points table big change in group 2)

पॉइंट टेबलची स्थिती काय आहे?

ग्रुप 2 च्या पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशने सुपर 12 च्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करून 2 गुण मिळवले आहेत. दुसरीकडे, त्याचा रन रेट +0.450 आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला पराभव केल्यानंतर 2 गुणांची कमाई केली. या विजयासह रोहित ब्रिगेडचा रनरेट +0.050 आहे. पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान सध्या पाचव्या तर नेदरलँड सहाव्या स्थानावर आहे. भारतीय संघ आता आपला दुसरा सामना 27 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. (t20 world cup points table big change in group 2)

जर सुपर 12 फेरीतील सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास गट 1 आणि गट 2 मध्ये 6-6 संघ आहेत. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर सर्व संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. अशा प्रकारे सुपर 12 मध्ये प्रत्येक संघाला 5-5 सामने खेळायचे आहेत. या फेरीत दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यामुळे या फेरीतील स्थान हे अधिक महत्त्वाचे ठरते. इथे असेही होऊ शकते की जर एखादा संघ 5 पैकी 3 किंवा 4 सामने जिंकून सुद्धा सेमीफायनलमध्ये पोहचू शकत नाही. त्यामुळे या फेरीतील सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.

काय झाले बांगलादेश विरुद्ध नेदरलँड सामन्यात….

दरम्यान, नेदरलँड संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय अगदी योग्य ठरला, कारण बांगलादेशचा संघ 20 षटके खेळून 8 विकेट गमावून 144 धावा करू शकला. बांगलादेशकडून अफिफ हुसेनने 38, तर नजमुल शांतोने 25 धावा केल्या. नेदरलँड्सच्या व्हॅन मेकर्न आणि बेस डिल्डे यांनी 2-2 बळी घेतले. इतर 4 गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँड संघाला त्यांच्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन धक्के बसले. त्यातून हा संघ सावरू शकला नाही. त्यानंतर अवघ्या 15 धावसंख्येवर त्यांचे 4 फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, यानंतर कॉलिन अ‍ॅकरमनने टॉम कुपरसह डाव सावरला. दोघांमध्ये 44 धावांची भागिदारी झाली. यानंतर कुपर बाद झाला. त्यानंतर लगेचच टिम प्रिंगल, लोगान बीक, शरीझ अहमद, कॉलिन अकरमन हे फलंदाज फटकेबाजीच्या नादात ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतले. पण 17 व्या षटकानंतर कॉलिन अ‍ॅकरमन याने पॉल मीकरेनच्या साथीने मोठे फटके मारले आणि विजयासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला. कॉलिन अ‍ॅकरमन 62 धावांची तुफानी खेळी केली. उर्वरित फलंदाजांची साथ न मिळाल्याने नेदरलँडचा संघ 20 षटकांत 135 धावांत गुंडाळला गेला आणि त्यांनी हा सामना 9 धावांनी गमावला. बांगलादेशकडून तस्किन अहमदने 4, तर हसन महमूदने 2 बळी घेतले.

SCROLL FOR NEXT