जयसिंगपूर; संतोष बामणे : कृष्णामाई जलतरण मंडळाच्या सदस्यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला. हातात तिरंगा घेऊन हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमापासून ते उदगाव येथील कृष्णाघाटापर्यंत तब्बल 9 किलोमीटरचे अंतर 1 तास 10 मिनिटांमध्ये पार केले. मंडळाच्या 22 सदस्यांचा समावेश होता.
उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णामाई जलतरण मंडळाने अनेक विधायक कामे हाती घेतली आहेत. कृष्णाघाटावरील स्वच्छता, ब्रिटीशकालीन पुलावरील दगडी बांधकामातील अनावश्यक झाडे तोडणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे तसेच असंख्य मुलामुलींना मोफत पोहण्यास शिकवणे आदी कामांचा समावेश आहे. तसेच हरिपूर ते उदगाव कृष्णाघाट व उदगाव ते मिरज असा जवळपास 20 किलोमीटर अंतराचा साहसी जलप्रवासाच्या स्पर्धा आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबवून शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून गौरविणे अशी अनेक कामे मंडळामार्फत केली जात आहेत.
७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन देश साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर उदगाव येथील कृष्णमाई जलतरण मंडळानेही हातात तिरंगा घेऊन ९ किलोमीटर अंतर पोहत येण्याचा निर्णय घेतला. रविवारी पहाटे उपक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये राजू कलगुटगी, प्रा.सुनिल बनहट्टी, जयपाल मगदूम, गणेश पाचंगे, नितीन पाटील,तानाजी जाधव,महेश महाडिक, ऋषभ पाटील, विक्रम घाटगे, संतोष चुडाप्पा, कोळेकर अण्णा, बाळासो चौगुले तसेच मंडळाच्या अनेक सदस्यांनी पुढाकार घेतला होता. हा उपक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा