पुणे; पुढारी वृत्तसेवा : खा. संजय राऊत यांच्याविषयी नितेश राणेंसह कोणीही उठतो अन् कपडे फाडण्याची भाषा करतो, यावरून राजकारणाची पातळी किती खाली गेलीय, हे दिसून येते. त्यातल्या त्यात मनसे अधूनमधून त्यांचे अस्तित्व दाखवण्यासाठी बोलत असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना पुण्यात केली.
जागतिक व्यंग्यचित्रकार दिनानिमित्त शनिवारी (दि. 3) पुण्यात भरविलेल्या व्यंग्यचित्रांचे प्रदर्शन पाहिल्यानंतर अंधारे पत्रकारांशी बोलत होत्या. प्रदर्शनात असलेल्या व्यंग्यचित्रांबाबत आपल्या राजकीय शैलीत भाष्य करीत सांगितले की, काही काही चित्रे तर आजची राजकीय स्थिती दर्शविणारी आहेत. म्हणजे सत्तेसाठी दोन्ही डगरीवर हात ठेवून बसलेले अनेक जण दिसताहेत. उद्या काही राजकीय परिस्थिती बदलली, तर लगेच कशी उडी मारता येईल, हे शब्दांतून लिहिण्याऐवजी व्यंगातून मांडलेले आहे.
संजय राऊत थुंकी प्रकरणावरून रान पेटविले जात असले, तरी अशा प्रकारच्या आंदोलनाला अर्थ नाही. कुठल्याही विषयाला घेऊन आंदोलने करायची आणि आपण चर्चेत राहायचे, असा प्रयत्न सत्ताधार्यांकडून केला जात आहे. मनसे नेत्यांनी राऊत यांच्याविषयी बोलणे म्हणजे अजूनमधून त्यांच्या पक्षाचे अस्तित्व असल्याचे दाखवून देण्याचा खटाटोप आहे. अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची भाषा करणारा नितेश राणे लहान पोर आहे, असे समजून, त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तर काही चुकीचे नाही, अशीही मिश्किल टीका अंधारे यांनी केली.
पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये अस्तित्व नसल्याची केलेली भाषा आणि एकनाथ खडसेंची आजची होणारी भेट, यावरून राजकीय भूकंप होऊ शकतो का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, पंकजा मुंडे कितीही नाराज असल्या, तरी त्या असं काहीही करू शकणार नाहीत, असं मला वाटतं. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे घनिष्ठ संबंध पाहता, त्यांच्यानंतर वडीलधारी म्हणून खडसे हे पंकजा मुंडेंना भेटत असतील, असे वाटते. पक्ष सोडण्याच्या या केवळ सध्यातरी अफवाच असल्याचे ठामपणे त्यांनी सांगितले.
हेही वाचा