अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्त्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. यास्पर्धेत 3 ते 10 लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्या अमृत शहरामध्ये अहमदनगर महानगर पालिकेचा समावेश असून मुंबई येथे दि 5 जून 2023 रोजी होणार्या माझी वसुंधरा 3.0 सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.
आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकाने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांचे वतीने महापालिका आयुक्त, महापौर पदाधिकारी व अहमदनगर महानगरपालिकेचे अभिनंदन करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा अभियान 3.0 सन्मान सोहळा सोमवार दि. 5 जून 2023 रोजी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जमशेद भाभा थिएटर, एन. सी.पी.ए. नरिमन पॉईंट, मुंबई यथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्वोत्तम कामगिरी करणार्या अमृत शहरामध्ये अहमदनगर महानगरपालिकेचा समावेश झाल्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांचे कष्टाचे यश आहे. सातत्याने सर्वोत्तम शहर ठेवण्यासाठी आणि नागरी सुविधा देण्यासाठी मी आणि सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील राहू.
– रोहिणी शेंडगे, महापौर
हेही वाचा