Latest

लखीमपूर खिरी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

निलेश पोतदार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकरण घडले होते. या प्रकरणातला आरोपी आशिष मिश्रा याच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

आरोपी आशीष मिश्रा याचा जामीन रद्द केला जावा, असा सल्ला दोनवेळा उत्तर प्रदेश सरकारला आम्ही दिला होता, अशी माहिती सदर घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडून सुनावणीदरम्यान देण्यात आली. दुसरीकडे गुन्हा गंभीर असला तरी आरोपी आशिष मिश्रा हा पळून जाणाऱ्यापैकी नाही, असा युक्तिवाद उत्तर प्रदेश सरकारकडून ॲड. महेश जेठमलानी यांनी केला.

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ लोकांचा मृत्यू झाला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला जामीन दिला होता. त्या विरोधात पीडितांच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे.

या आधी झालेल्‍या सुनावणीत मुख्य आरोपी आशिष मिश्रा याचा जामीन का रद्द केला जाऊ नये? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी उत्तर प्रदेश सरकारला केली होती. आशिष हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आहे.

लखीमपूर खिरी प्रकरणातील साक्षीदारांवर हल्ला झाल्याची बाब ॲड. प्रशांत भूषण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर सर्व साक्षीदारांना आवश्यक ती सुरक्षा द्यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिष मिश्रा याचा जामीनअर्ज मंजूर केला होता. दरम्यान गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता आरोपीला जामीन देणे चुकीचे असल्याचे भूषण यांनी सांगितले होते. अंगावर गाडी घालण्याच्या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अन्य चार लोकांचा मृत्यू झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT