Latest

गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा, संजय राऊतांचा गंभीर आरोप

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत आज शनिवारी शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. उभय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड भाजपचं असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठी कोण फंडिग करतंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

पवारांच्या घरावरील हल्ल्याचे समर्थन जे विरोधी पक्षाचे नेते करत आहेत हा दळभद्रीपणाचा कळस आहे. कालच्या प्रसंगामागे कारस्थान आहे. ते आंदोलन नव्हते. तर तो हल्ला होता. देशाच्या राजकारणात पवारांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या घरावर हल्ला करण्याचे पाप तुम्ही कुठे फेडाल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कामगारांच्या मागण्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे. पण कामगारांच्या एका गटाला भडकावून सरकारविरोधात गरळ ओकण्याचा, हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपकाऱ्यांकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकीट कसे आले? असा सवालदेखील त्यांनी केला आहे.
इतकं गुळगुळीत सत्ताकारण चालत नाही, त्याचे परिणाम काल आम्ही भोगले, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे.

पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे काही अतृप्त आत्म्यांचा हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी याआधी केला होता. पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर काल शुक्रवारी एसटी कर्मचारी आंदोलकांनी दगड, चपला भिरकावल्या होत्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत या प्रकारास जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या घटनेवर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरांवर लोक चाल करुन जातात मग पोलिस काय करत होते? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

हे भयावह दृश्य होते. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. कालची घटना ही पोलिसांचे अपयश आहे. माध्यमांना या घटनेची माहिती होते तर पोलिस काय करत होते? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT