नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली ही बैठक बंद दाराआड २० मिनिटे झाल्याने यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुका भाजपने मिळवलेले यश याचबरोबर राज्यातील राजकीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मोदी यांनी आज महाराष्ट्रातील खासदारांशी संवाद साधला, त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक होणार आहे, त्यामुळेही रणनीतीच्या दृष्टीने राऊत-पवार भेट महत्त्वाची मानली जात आहे.
संजय राऊत आणि शरद पवार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. यामुळे दोघेही भेटणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. राज्यात होणाऱ्या 'ईडी'च्या कारवाया राज्य सरकारला विरोधकांकडून होणारा विरोध यावर यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकाल, महाराष्ट्रातील राजकारण, ईडीच्या कारवाया आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
काश्मीरचं सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला. जे घडलं ते सत्य दाबलं गेलं. ते कधीचं बाहेर आलं नाही. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिलीय.
"काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. त्यावेळी बाकी सगळे अतिरेक्यांच्या भीतीने गप्प होते. पण आता ३२ वर्षांनी काश्मिरच्या पंडिताची आठवण का आली.?" असा सवाल राऊत यांनी दिल्लीत बोलताना केला आहे. पंतप्रधान मोदी चित्रपटाचे प्रचारक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून द काश्मीर चित्रपटाचा वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली.