Raju Shetti : स्वाभिमानी पुन्हा भाजपसोबत युती करणार का ? राजू शेट्टींनी केला खुलासा | पुढारी

Raju Shetti : स्वाभिमानी पुन्हा भाजपसोबत युती करणार का ? राजू शेट्टींनी केला खुलासा

पु़ढारी ऑनलाईन डेस्क : माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत काडीमोड  घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले. याचबरोबर राज्य सरकारने घटक पक्षांना जमेत न धरल्याने राजू शेट्टी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. यावेळी शेट्टींनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. परंतू मागच्या दोन वर्षात महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांच्या मागण्यांना स्थान न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. याबाबत राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केल्यास ते म्हणाले की, ५ एप्रिल २०२२ ला राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत पुढील निर्णय घेणार असल्याचे शेट्टींनी सांगितले.

शेट्टी पुढे म्हणाले की, मागच्या दोन वर्षात आम्ही महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला, पण महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवली. विज बिलासंदर्भातील प्रश्न असोत किंवा पुरग्रस्तांसाठी दिलेली तोकडी मदत यावरून आम्ही सरकारविरोधात वेळोवेळी आंदोलने करून ही त्यांनी शेतकऱ्यांनी पुरेसी मदत केली नाही, असे शेट्टी म्हणाले.

Raju Shetti : ५ एप्रिलला फैसला होणार

५ एप्रिलला स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची कोल्हापूर येथे बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये आम्ही महाविकास आघाडीसोबत रहायचे की नाही हा निर्णय घेणार आहोत. याचबरोबर आम्ही भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे यासंदर्भात असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. २०२४ साली आम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने आम्ही आता कोणताही निर्णय घेणार नसल्याचे ते म्हणाले.

१२ आमदारांच्या नियुक्तीवर ते म्हणाले की, सध्या आमची मागणी शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आहे यावर आम्ही सरकारसोबत पाठपुरावा करत आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल निर्णय घेणार आहेत. दरम्यान आमच्या कार्यकारणीत महाविकास आघाडीसोबत फारकत घेण्याचा निर्णय झाल्यास आम्ही आमदारकी घेण्याचा प्रश्नच राहत नसल्याचे ते म्हणाले.

Back to top button