Latest

आमदार शिफारस यादीतून माझे नाव वगळा; राजू शेट्टींचे राज्यपालांना पत्र

अविनाश सुतार

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे संघटनेचा आणि महाविकास आघाडीचा संबंध संपला आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी बारा व्यक्तींच्या नावाची शिफारस केलेल्या यादीतून माझे नांव वगळण्यात यावे, अशा मागणीचे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज (शुक्रवार) दिले.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा विधानपरिषद सदस्य नेमण्यासाठी मंत्रिमंडळाचा ठराव करून १२ व्यक्तींच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे. त्या यादीमध्ये राजू शेट्टी यांचे सामाजिक, कृषी व सहकार या विभागातील माहितीगार व अनुभवी व्यक्ती म्हणून शिफारस केली आहे.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, बारा आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये झालेले आरोप, प्रत्यारोप, कुटील व गलिच्छ राजकारण यामुळे महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणजे चेष्ठा व टिंगलटवाळीचा विषय झालेला आहे.

मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, त्या सहकार आणि कृषी क्षेत्रातील अनेक धोरणाबद्दल माझ्यासहीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आक्षेप आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सरकार स्थापनेपासून घटक पक्षांना विश्वासात न घेता राज्यकर्त्यांच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक शेती, सहकार या क्षेत्रात चुकीचे घोरणे राबविले जात आहेत. यामुळे या सरकारच्या शिफारशीवरून विधानपरिषद सदस्यत्व स्वीकारणे मला नैतिकदृष्ट्या अयोग्य वाटते. म्हणून, ज्यावेळी आपला व राज्य सरकारचा समझोता होऊन बारा सदस्यांना नियुक्त करण्याचा निर्णय होईल. त्यावेळेस त्या यादीतून माझे नाव वगळण्यात यावे, असे लेखी पत्राद्वारे राज्यपालांना कळविले आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, रविकांत तुपकर, बापूसाहेब कारंडे, सुरेंद्र पंढरपूरे, दिनेश ललवानी, सचिन कड, आकाश दौंडकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT