Latest

RBI चे ३ सहकारी बँकांवर निर्बंध! पैसे काढण्यावरही मर्यादा, महाराष्ट्रातील २ बॅंकांचा समावेश

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : रिझव्‍‌र्ह बँकेने (RBI) तीन सहकारी बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यावर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. यात महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बॅंक, सोलापूर येथील करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि आंध्र प्रदेशातील दुर्गा को- ऑपरेटिव्ह बँकेचा समावेश आहे.

वसमत येथील जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँकेवर निर्बंध लादले असून या बॅंकेच्या ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत, असे RBI ने एका निवेदनात म्हटले आहे. दुसर्‍या एका निवेदनात RBI ने असे म्हटले आहे की सोलापूरमधील करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकचे ठेवीदार त्यांच्या खात्यातून केवळ १० हजार रुपये काढू शकतात.

आरबीआयने विजयवाडा येथील दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवरही निर्बंध लादले आहेत. या बँकेचे ग्राहक त्यांच्या ठेवींमधून १.५ लाख रुपये काढू शकतात. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९ अंतर्गत तीन बँकांवर लादलेले निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहेत.

या बँकांवरील निर्बंधांचा भाग म्हणून, दोन सहकारी बँका कर्ज देऊ शकत नाहीत. कोणतीही गुंतवणूक करू शकत नाहीत. तसेच कोणत्याही नवीन ठेवू स्वीकारु शकणार नाहीत. तसेच पैसे उधार घेणे आणि मालमत्तेचे वितरण आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तीन बँकांना निर्देश जारी करणे म्हणजे त्यांचा बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँका निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवतील, असेही नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT