पुणे, पुढारी वृत्तसेवा : म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना पुणे सायबर पोलिसांनी विविध जिल्ह्यात छापे टाकले. यावेळी लातूर परिसरातून महत्वाच्या दोन एंजटना अटक केली आहे. या दोघांचा टीईटी गैरव्यवहार प्रकरणात देखील सहभाग असल्याचे आढळून आले आहे. दोघांनी कोट्यावधी रूपये गोळा करून दिल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तर, शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहारात आणखी एका एजंटला अटक केली आहे. (Pune)
जमाल इब्राहिम पठाण (वय ४७, रा. जळगपूर, ता. लातूर) आणि कलीम गुलशेर खान (वय ५२, रा. बुलढाणा) यांना म्हाडा गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर, टीईटी गैरव्यवहारात मुकुंदा जगन्नाथ सुर्यवंशी (वय ३३, रा. नाशिक) याला नाशिक येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune)
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान व पठाण हे एजंट असून त्यांनी या गुन्ह्यात अटक असलेले हरकळ बंधू यांना उमेदवार मिळवून देत त्यांच्याकडून पैसे घेऊन दिले होते. पठाण हा लातूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. त्यावेळी कलीम हा बुलढाना येथून त्याच्याकडे लपण्यासाठी आला असल्याचे समजल्यानंतर दोघांना ही लातूर येथून एकाचवेळी अटक करण्यात आली आहे. या दोघांचा टीईटी गैरव्यवहारात देखील सहभाग असल्याचे दिसून आले आहे. या दोघांनी टीईटीमधील उमेदवार हरळक बंधूना मिळवून दिले होते. त्यानुसार त्यांच्याकडे तपास सुरू आहे. (Pune)
तसेच, टीईटी गैरव्यवहार प्रकरणात अटक केलेला सुर्यंवशी हा देखील सर्वात महत्वाचा एजंट आहे. त्याने उमेदवारांना पात्र करण्यासाठी हरकळ बंधूना एक कोटी 80 लाख रूपये दिल्याचे समोर दिसून आले आहे. सुर्यंवंशीची देखील माहिती सायबर पोलिसांना हरकळ बंधूकडूनच मिळाली होती. त्यानुसार नाशिक येथे जाऊन सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. आरोपींनी म्हाडा पेपर मिळवू देण्यासाठी उमेदवारांची यादी तयार केली होती. तसेच 2018,2019-20 कालवधीत झालेल्या टीईटी परिक्षेत देखील गैरव्यवहार केल्याचे दिसून आले आहे. पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत. (Pune)
हेही वाचलत का?