पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि. 16 ) उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे ( Purvanchal Expressway ) लोकार्पण झाले. यापूर्वी पंतप्रधान मोदी हे भारतीय लष्कराच्या सुपर हर्क्युलस विमानातून पूर्वांचल द्रुतगती मार्गावर ( Purvanchal Expressway ) उतरले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, तीन वर्षांपूर्वी मी पूर्वांचल एक्स्प्रेस वेची पायाभरणी केली होती, तेव्हा या एक्स्प्रेस वेवर मी उतरेन, असे वाटले नव्हते. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्रीही माझ्या पाठीशी उभे राहण्यास घाबरत होते. त्यांना त्यांची व्होट बँक गमावण्याची भीती होती, असा टोलाही त्यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे नाव न घेता लगावला. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांचा विकास फक्त घरापुरताच मर्यादित होता. पण आज पूर्वांचललाही तितकंच महत्व प्राप्त झालं आहे. आज पूर्वांचल एक्सप्रेस वे यूपीची मागील दरी भरून काढत आहे, यूपीला एकमेकांशी जोडत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशमध्ये आम्ही अशा सरकारांचा दीर्घकाळ पाहिला, ज्यांनी कनेक्टिव्हिटीची चिंता न करता औद्योगिकीकरणाची स्वप्ने दाखवली. त्याचा परिणाम असा झाला की, आवश्यक सुविधां अभावी येथे बसविण्यात आलेल्या अनेक कारखान्यांना टाळे लागले. दिल्ली आणि लखनौ या दोन्ही ठिकाणी कुटुंबवाद्यांचे वर्चस्व होते हेही दुर्दैवी होते. कोणी आपले घर बांधले तर तो मातीचे परीक्षण करतो, इतर पैलू पाहतो. मात्र मागील सरकारांनी येथील कनेक्टिव्हिटीची माहिती न घेता केवळ आश्वासने दिली, असेही पंतप्रधान माेदी म्हणाले.
आज मी पाहतोय की काही लोक आपला संयम गमावत आहेत, विचलित होत आहेत, हे तेच लोक आहेत जे त्यांच्या काळात यशस्वी झाले नाहीत, मग योगीजींचे यश पाहून ते अस्वस्थ होतात. आज राज्यात विकास होत असल्याने त्याचा सर्वाधिक लाभ आपल्या भगिनींना मिळत आहे. घर, वीज, पाणी, स्वच्छतागृह, स्वयंपाकाचा गॅस मिळाल्याने त्यांची सर्वात मोठी समस्या दूर झाली आहे, असेही माेदी म्हणाले.
ज्या पद्धतीने यूपीचा विकास होत आहे, त्यावरून यूपीचे नशीब बदलू लागले आहे. यापूर्वी किती वीजपुरवठा खंडित व्हायचा, यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती भयानक होती. इथल्या वैद्यकीय सुविधांची काय व्यवस्था होती हे सर्वांनी पाहिले आहे. आधीच्या सरकारांनी यूपीची अशी अवस्था केली होती की इथे रस्ता होता की नव्हता हे कोणी सांगू शकणार नाही, असेही माेदी म्हणाले.
अनेक दशकांपासून पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणार्यांसाठी इथून काही वेळात विमानांची गर्जना होईल. हा पूर्वांचल एक्सप्रेस वे यूपीच्या विकासाचा एक्सप्रेस वे आहे. तो यूपीची शान आहे, त्यामुळे हा एक्सप्रेस वे यूपीच्या लोकांना समर्पित करण्यात मला धन्यता वाटते. यूपीसारख्या विस्तीर्ण राज्यात एक शहर दुसऱ्या शहरापासून दूर राहायचे, हेही वास्तव आहे. पूर्वांचलच्या लोकांसाठी लखनौला पोहोचणे म्हणजे महाभारत जिंकल्यासारखे होते. 9 जिल्ह्यांना जोडण्याची खासियत पूर्वांचल एक्स्प्रेस वेची आहे. तर हा पूर्वांचल एक्सप्रेसवे लखनौला त्या शहरांशीही जोडेल जिथे विकासाची प्रचंड क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.