नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
एका विशेष वर्गाची लोकसंख्या वाढत राहिली तर देशभरात अराजकता निर्माण होईल, या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असतानाच भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ( Naqvi on population ) 'लोकसंख्या विस्फोटाचा मुद्दा धर्माशी जोडणे चुकीचे' असल्याचे सांगितले आहे. नक्वी यांनी सोशल मीडियावरून मंगळवारी या विषयावर आपले मत व्यक्त केले.
लोकसंख्या विस्फोटाचा मुद्दा धर्माशी अथवा जातीशी जोडणे उचित नाही. ही समस्या पूर्ण देशाची आहे. असे नक्वी यांनी म्हटले आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ अलीकडेच संपला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. येत्या 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. या पदासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून जी नावे चर्चेत आहेत, त्यात नक्वी यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जागतिक लोकसंख्या दिवसानिमित्त लखनौमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली होती. लोकसंख्या वाढीमुळे असंतुलन निर्माण होत असून एका विशेष वर्गाची लोकसंख्या वेगाने वाढली तर देशात अराजकता निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला होता. लोकसंख्येचे स्थिरीकरण करण्यासाठी जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या वर उठून व्यापक कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते.
योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या वाढीबाबत केलेले विधानावर समाजवादी पार्टीनेही टीका केली आहे. लोकसंख्येचा प्रश्न हा देशाचा प्रश्न आहे. लोकसंख्या समस्येवर उपाययोजना करण्याची सरकारची जबाबदारी आहे. रोजगारामध्ये वाढ आणि देशाची अर्थ व्यवस्था सदृढ करण्याचीही सरकारचीच जबाबदारी असून, ही जबाबदारी सरकार यापासून पलायन करु शकत नाही, असे समाजवादी पार्टीने म्हटलं आहे.
हेही वाचा :