पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमधील तेल अवीव येथून भारतीयांना घेवून येणारे दुसरे विमान शनिवारी सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. ही संख्या २३५ आहे. या सर्वांचे स्वागत विमानतळावर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी केले. इस्रायल-हमास युद्धात अडकलेल्या तब्बल ४४७ भारतीय नागरिकांना 'ऑपरेशन अजय' अंतर्गत भारतात परत आणण्यात आले आहे. (Operation Ajay)
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री आपल्या 'X' अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "235 भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे दुसरे विमान इस्रायलच्या तेल अवीव येथून निघाले," इस्रायल मधुन परत आलेल्या भारतीयांनी ' ऑपरेशन अजय' या उपक्रमाबद्दल भारत सरकारचे कौतुक केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
तेल अवीव येथून दुसऱ्या विमानाने उड्डाण करण्यापूर्वी एएनआयशी बोलताना भारतीय प्रवासी आशिष कुमार म्हणाले, "मी भारतात जात आहे. येथे, मी कृषी संशोधन संस्थेत पोस्ट-डॉक्टरेट विद्यार्थी आहे. मध्य इस्रायलमधील परिस्थिती अगदी सामान्य आहे. गाझा सीमा, बीरशेबा आणि जवळपासच्या प्रदेशांसारखे नाही." पुढे बोलत असताना ते म्हणाले की, "मला वाटते की भारत सरकारचे 'ऑपरेशन अजय' हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. त्यामुळे मी यासाठी सरकारचे कौतुक करतो".वागेश द्विवेदी या प्रवाशाने 'ऑपरेशन अजय' हे अतिशय सकारात्मक पाऊल आहे आणि मी त्याचे खरोखर कौतुक करतो असं म्हटलं आहे.
गेले काही दिवस इस्रायल-हमास संघर्ष सुरु आहे. याचे पडसाद जगभर पडत आहेत. इस्रायलमधील सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "ऑपरेशन अजय" सुरू केले. इस्रायलमधील भारतीयांची नोंदणी गुरुवारी (दि.१२) सुरू झाली आहे. शुक्रवारी, ऑपरेशन अजय अंतर्गत 212 भारतीय प्रवाशांना घेऊन पहिले विमान दिल्लीत उतरले.