Latest

भारतातील एक कोटी लोकांना स्मृतिभ्रंश : नवीन अभ्‍यासातील निष्‍कर्ष

Arun Patil

नवी दिल्ली : भारतातील 60 किंवा त्याहून अधिक वयाच्या दहा दशलक्ष किंवा एक कोटीपेक्षा जास्त वृद्धांना स्मृतिभ्रंश असू शकतो, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. न्युरोएपिडेमिऑलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे की, भारतातील एक कोटीहून अधिक लोकसंख्या स्मृतिभ्रंश या आजाराने ग्रस्त आहे. हा आकडा अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांमध्ये नोंदवलेल्या आकडेवारीच्या बरोबरीचा अथवा समान आहे.

 न्युरोएपिडेमिऑलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 31 हजार 477 वृद्ध प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी सेमी-सुपरव्हाईज्ड नावाचे एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरले गेले. संशोधकांना आढळून आले की, भारतात 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण 8.44 टक्के आहे. म्हणजे देशात आता असलेल्या वृद्ध व्यक्तींमधील जवळपास एक कोटी वृद्धांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत हाच दर 8.8 टक्के, ब्रिटनमध्ये नऊ टक्के तर जर्मनी- फ्रान्समध्ये 8.5 ते 9 टक्के आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ सरे, मिशिगन युनिव्हर्सिटी, दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) यासह विविध संस्थांमधील संशोधकांच्या गटाने एक मॉडेल तयार केले आहे. हे मॉडेल डेटासह विलीन केले गेले. यात नवीन ऑनलाईन एकमताद्वारे स्मृतिभ्रंशाचे (डिमेन्शिया) निदान झालेल्यांपैकी सुमारे 70 टक्क्यांचा लेबल केलेला डेटासेट समाविष्ट आहे.

डिमेन्शिया अथवा स्मृतिभ्रंशाचा सर्वाधिक धोका वृद्ध, स्त्रिया, अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागात राहणार्‍या लोकांना असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला. भारतातील तपासणीत तीस हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला होता, असे या अभ्यासाचे सहलेखक आणि युनायटेड किंग्डममधील सरे युनिव्हर्सिटीतील हाओमियाओ जिन यांनी नमूद केले. डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंशामध्ये दिसणार्‍या सामान्य न्युरोलॉजिकल लक्षणांमध्ये स्मृती कमी होणे, संवाद साधण्यात किंवा शब्द सुचण्यात अडचण, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेत कमतरता येणे आणि कठीण कामांचे नियोजन करण्यात आणि ती कामे करण्यात अडचण येणे यांचा समावेश होतो.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT