नाशिक (इगतपुरी तळेगाव) : पुढारी वृत्तसेवा
जुन्या पेन्शनसाठी उत्तर भारतातून सुरू झालेली एल्गार यात्रा रविवारी (दि. २५) नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पंचवटी येथील जनार्दन स्वामी मठातील भक्तनिवासात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात मागील काही वर्षांपासून जुनी पेन्शनच्या मागणीसाठी प्रचंड मोठे आंदोलन उभे राहिले आहे. मार्चमध्ये राज्यव्यापी संपानंतर या मागणीने रौद्ररूप धारण केले आहे. जुनी पेन्शन बंद करून सरकारच्या वतीने देण्यात येणारी नवीन पेन्शन स्कीम अर्थात एनपीएसच्या विरोधासाठी एनएमओपीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू यांच्या नेतृत्वाखाली बिहार येथील चंपारण येथून दि. 1 जूनपासून एनपीएस निजीकरण भारत छोडो यात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे. दि. २३ जून रोजी ही यात्रा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात दाखल झाली. मुक्ताईनगर, बुलडाणा, जालना, नगर, पुणे मार्गे रविवारी ती नाशिकमध्ये दाखल होत आहे. नाशिक जिल्ह्यासोबतच धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील या यात्रेचे नेतृत्व विजयकुमार बंधू यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर हे करत आहेत. गेल्या मार्च महिन्यात झालेल्या राज्यव्यापी संपानंतर सरकारने समिती स्थापन करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. देशातील पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर महाराष्ट्रातदेखील ही योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी बंधू राज्य सरकारवर काय घणाघात करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील आणि विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष वैभव गगे, सरचिटणीस प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे.