नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याच्या वादावरून मुंबईत रणकंदन माजले. याप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राणा यांनी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही आयुक्तांकडे केली आहे.
पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात राणा यांनी म्हटले आहे की, मी अनुसुचित जातीतून लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्याने राऊत मला वैयक्तिकरित्या त्रास देत आहेत. त्याचबरोबर मी शिवसेना उमेदवाराविरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ऐनकेन प्रकारे मला शिवसेनेकडून त्रास दिला जात आहे. त्यांच्याकडून माझ्या जातीवरून अनेक प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. मी चांभार जातीची असल्याने मला हिणवले जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यापासून तर मला शिवसेनेकडून अधिक लक्ष्य केले जात आहे, असा आरोप राणा यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आपल्याबद्दल जातीयवादी वक्तव्य केली आहेत. शिवसैनिकांना माझ्या घराला घेराव घालण्यास सांगितल्याचा आरोप करून राणा यांनी पत्रात लिहिले आहे की, राऊत यांनी अनेकवेळा 'बंटी बबली' आणि ४२० असे आपल्याला संबोधले आहे. राऊत आपल्याला वैयक्तिकरित्या त्रास देत आहेत आणि माझ्या जातीला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप राणा यांनी पत्रात केला आहे.
हेही वाचलंत का ?