नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिकने देशात एकविसावा तर राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. राज्यात ठाणे पहिले मुंबई दुसरे तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Nashik)
केंद्र सरकारच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे नॅशनल क्लीन एअर पॉलिसी अंतर्गत देशभरातील विकसित आणि विकासनशिल शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी शहरांना केंद्रातर्फे अनुदान स्वरूपात निधीदेखील दिला जात आहे. या उपायोजनांचाच एक भाग म्हणून देशपातळीवर स्वच्छ हवा सर्वेक्षण केले जात आहे. यंदा या सर्वेक्षणाकरिता देशभरातील शहरांची तीन गटात वर्गवारी करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 131 शहरांमध्ये नाशिकचा समावेश होता. या सर्वेक्षण अंतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वेक्षणात सहभागी शहरांनी केलेल्या कार्याचे मूल्यमापन करून क्रमवारी निश्चित करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये या सर्वेक्षणातील पुरस्कारांची घोषणा केली. सर्वेक्षणातील 200 गुणांपैकी नाशिकने 160.03 गुण मिळवत देशात 21 वा क्रमांक पटकावला आहे. घनकचरा संकलन, रस्त्यावरील धुळीबाबत केलेल्या उपाययोजना, बांधकाम साहित्याची विल्हेवाट, बांधकामाचे ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या सुरक्षित जाळ्या, वाहनांच्या धुरातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना ध्वनी प्रदूषणाची तपासणी केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या गुणांनुसार शहरांची क्रमवारी निश्चित करण्यात आली.
राज्यात नाशिक चौथे
यंदा नाशिकमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नाशिक महापालिकेने केलेल्या उपाययोजनांना यश आले आहे. गतवर्षी स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिकला 138 गुण मिळाले होते परंतु क्रमवारीत स्थान मिळाले नव्हते. यंदा मात्र नाशिक देशात एकविसावे, तर राज्यात चौथे क्रमांकावर आले आहे. राज्यात पहिला येण्याची नाशिकची संधी अवघ्या 25 गुणांनी हुकली आहे. ठाणे 185 गुण मिळवत महाराष्ट्रात पहिले तर देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिकच्या हवा गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचा दावा नाशिक महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केला
हेही वाचा :