नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उच्च ध्येयासक्तीमुळे रायबोजोम संरचनेच्या शोधाला यश आले असे नोबेल पुरस्कार विजेत्या ॲडा योनाथ यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विज्ञापीठात आयोजित १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये (108th Indian Science Congress) आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
ॲडा योनाथ यांनी 'एव्हरेस्टच्या पलिकडील एव्हरेस्ट' हा व्याख्यानाचा विषय निवडून सभागृहात उपस्थित देशभरातील वैज्ञानिकांना संबोधित केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, ॲडा योनाथ (Nobel Prize Winner Ada Yonath) यांची कन्या अदी योना, कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ.संजय दुधे, अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे, डॉ श्याम कोरट्टी मंचावर उपस्थित होते.
या वेळी ॲडा योनाथ (Nobel Prize Winner Ada Yonath) यांनी त्यांच्या संशोधनाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "1980 मध्ये रायबोजोम संरचनेच्या शोधाला सुरुवात केली, तेथून सहा वर्षांनंतर या संशोधनाला पहिले यश मिळाले. हा आनंद अल्पजीवी मानून उच्च ध्येयासक्तीने संशोधनासाठी पुन्हा कार्यरत राहिले. या कार्यामुळे 2009 च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारावर नाव कोरू शकले. वैज्ञानिकांनी उच्च ध्येयासक्तीने प्रेरीत होवून कार्य केल्यास त्यांचे कार्य अखिल मानवजातीसाठी एक श्रेष्ठ कार्य ठरेल," अशा शब्दात नोबेल विजेत्या इस्त्रायली वैज्ञानिक श्रीमती ॲडा योनाथ यांनी आज वैज्ञानिकांशी संवाद साधला.
या व्याख्यानात त्यांनी श्रीमती योनाथ यांनी मानवी शरीरातील रायबोजोमची संरचना शोधण्याच्या ध्येयाने प्रेरित होवून दक्षिण व उत्तर ध्रुवावरील प्राण्यांचा अभ्यास व त्यातील रोमहर्षक किस्से सांगितले. मृत समुद्रावरावर (डेड सी) जीवाणुंचा शोध घेवून त्यांच्यातील रायबोजोमचे संशोधन केले. त्याचबरोबर 195 अंश सेल्सियस पेक्षाही जास्त तापमानात प्राप्त डेटा संग्रहीत करण्याचे कार्य केले, अशी माहिती योनाथ यांनी यावेळी दिली.
योनाथ म्हणाल्या की, रायबोजोम संरचनेच्या संशोधन कार्यास १९८० मध्ये सुरुवात केली. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन, मेरी क्युरी यांचा आदर्श ठेवून त्यांच्या संशोधनाचा अन्वयार्थ लावत आम्ही पुढे गेलो. या संशोधनाच्या प्रवासात १९८६ मध्ये आम्ही H5OS चा शोध लावण्यात यश आले. तेव्हा वाटले होते की, हेच हिमालयाचे शिखर आहे, पण वर बघितले तर लक्षात आले अजूनही हिमालयाचे शिखर गाठणे शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा संशोधन कार्यास जोमाने सुरुवात केली. ५० हजार पद्धतीच्या प्रोटीनचा तसेच 20 प्रकारच्या अमिनो ॲसिड, पेशी आणि तंतुंचा अभ्यास केला. संशोधन कार्याला गती येत गेली.
रायबोजोमच्या जटील संरचनेचा एक एक अर्थ लागत गेला आणि आमचे संशोधन पूर्णत्वास गेले. थोड्या यशात आनंद न मानता उच्च ध्येयासक्तीने प्रेरीत होवूनच जनहिताचे संशोधन होवू शकते, याची प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर संशोधन कार्यात भारतीय वैज्ञानिक वेंकटरामन रामकृष्णन यांच्या यांच्याबद्दलही योनाथ यांनी कृतज्ञता देखील यावेळी व्यक्त केली.
रसायनशास्त्रातील संशोधनात मोलाचे योगदान देवून समस्त जगासाठी आदर्शवत कार्य करणाऱ्या नोबेल विजेत्या ॲडा योनाथ यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करून गौरविण्यात आले. कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वागतपर भाषण केले. आभार डॉ. श्याम कोरोट्टी यांनी मानले.
हेही वाचा