इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी नगरपालिकेचे अखेर महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले आहे. त्याबाबतची अधिसूचना नगरविकास विभागाने गुरुवारी रात्री उशिरा जारी केली. राज्य शासनाच्या या आदेशानंतर इचलकरंजी ही राज्यातील २८ वी महानगरपालिका असणार आहे.
आजच्या निर्णयामुळे नगरपालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया थांबणार असून पुढील निवडणूक महापालिका म्हणून होणार आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार इचलकरंजी नगरपालिकेत पाच खातेप्रमुखांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पनवेल महापालिकेच्या धर्तीवर सविस्तर प्रस्ताव तयार केला होता. आता याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इचलकरंजीत महानगरपालिका बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
साडेतीन लाख लोकसंख्या, ६३ नगरसेवक
इचलकरंजी शहराची लोकसंख्या 3 लाख 50 हजार एवढी असून मुदत संपल्यामुळे इचलकरंजी नगरपालिका विसर्जित करण्यात आली आहे. विसर्जित नगरपालिकेत 63 नगरसेवक होते. नगराध्यक्षपद भाजपकडे होते तर नगरपालिकेत बहुमत हाळवणकर, आवाडे, कारंडे गटाचे होते. 2011 च्या जनगणनेवर ही महापालिका अस्तित्वात आली आहे. कोरोनामुळे 2021 ची जणगनना होऊ शकली नाही.
इचलकरंजी महापालिका होण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या मार्ग गुरुवारी मोकळा झाला. खासदार धैर्यशील माने यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
हेही वाचा