पणजी : पुढारी वृत्तसेवा भाजपच्या अल्पसंख्याक आमदारांनी आणि मतदारांनी आपल्याला काळजी करायचे कारण नाही या गैरसमजात राहू नये, असा सल्ला केरळचे खासदार शशी थरूर यांनी दिला. येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी थरूर यांनी सांगितले की, केंद्रातील भाजप सरकार हे भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक प्रतिगामी, पूर्वग्रहदूषित आणि पक्षपाती सरकार आहे. सरकारने ज्या गोष्टी कधीही बोलू नयेत किंवा करू नयेत, अशा गोष्टी त्यांनी कोणतीही तमा न बाळगता खुलेआम केल्या आहेत.
आज ना उद्या भाजपच्या या वाईट वृत्तीचा अनुभव त्यांच्या अल्पसंख्याक मतदारांना आणि आमदारांना नक्कीच येणार आहे. मतदारांनी गोव्यात सांप्रदायिकता नाही, अशा गैरसमजात राहून भाजपला निवडून आणण्याची चूक करू नये. ते म्हणाले की , मी म्हापसा येथे एक चर्च पाहिले.
चर्चच्या फेस्तमध्ये कॅथलिक समाजाबरोबर हिंदू समाजही उपस्थिती लावतो हीच गोव्याची खरी ओळख आहे. असे असतानाही काही राजकारणी अयोध्येप्रमाणे येथे चर्च पाडून मंदिर बांधायला पाहिजे असे म्हणत असतील तर ते गोव्याच्या समाजासाठी धोकादायक आहे. शशी थरूर यांनी सांगितले की, भाजप सरकारमध्ये जबाबदारीचा अभाव आहे.
केंद्र सरकाने नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार देणार्या संस्थांमध्ये जाणीवपूर्वक नोकर भरती केलेली नाही. लोकपाल आणि माहिती आयुक्तांच्या अनेक जागा रिक्त ठेवल्या आहेत. त्यांनी माहिती आयुक्तांचे पगार, नोकरीचा कालावधी व अन्य अटी ठरवण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले. पणजीत दोन व्यक्ती एका दिवंगत नेत्याच्या वारसावर हक्क कुणाचा यावरून भांडत आहेत. पणजीकरांना एल्विस यांच्या सारख्या प्रामाणिक आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव असणार्या नेत्याची गरज आहे.
भाजपने 2017 साली आमदारांचा घोडेबाजार करून संपूर्ण लोकशाहीला बदनाम केले, अशी टीका तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांनी केली. आज काँग्रेसकडे केवळ दोन आमदार शिल्लक असले तरी सध्याचे सर्व उमेदवार हे नवीन,आदर्शवादी आहेत.
हेही वाचलत का?