नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : राज्य आणि परराज्यातून न्हावाशेवा बंदरात कंटेनर वाहतूक केली जाते. या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि उपाययोजना करण्यासाठी आज बुधवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सकाळी पाहणी दैरा करणार आहेत. यावेळी जेएनपीटी येथील कार्यालयात बैठक घेणार आहोत.
मुंबईसह परराज्यातून मोठ्या प्रमाणावर जेएनपीटी बंदरात कल्याण, शिळफाटा, मुंब्रा मार्गाने कंळबोली जंक्शन आणि मुंबईतून सायन पनवेल मार्गावर उरणफाटा येथून अवजड वाहनांची वाहतूक केली जाते. शिवाय याच मार्गाने जेएनपीटी बंदरात उतरलेल्या कंटनेरची नियोजित स्थळी नेण्यासाठीही याच मार्गाचा वाहतुकीसाठी वापर केला जातो.
या मार्गावर खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. शिवाय पार्किंगचा प्रश्न उध्दभवतो. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर या मार्गावर उपाययोजना आणि पार्किंग प्रश्न सोडविण्यासाठी आज बुधवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सिडको हद्दीतील आणि न्हावाशेवा जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या उरणफाटा, उरण,गव्हाणफाटा,न्हाशेवा या मार्गावर पाहणी करणार आहेत.
यावेळी जेएनपीटी, महापालिका, सिडको, एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मार्गावर दररोज सुमारे तीन ते चार हजार कंटेनरची वाहतूक होते. नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन उड्डाणपूल याच मार्गावर बांधण्यात आला आहे. तरीही उरणफाटा ते रेतीबंदर दरम्यान दररोज वाहतूक कोंडी ही होते.
याच मार्गावर लहान मोठे शंभरहुन अधिक खड्डे पडले आहेत. तर पुढे रेतीबंदरहुन उरण- न्हावाशेवा पर्यंत काँक्रिटीकरण केले असून तो मार्ग 12 किमीपर्यंत आहे. पुढे पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. गव्हाणफाटा याठिकाणी ही वाहतुक कोंडी होते. अनेकदा दुचाकीस्वारांचे प्राणांतिक अपघात होऊन मृत्यू झाला आहे.
अवजड वाहन चालकांकडून वाहतूक पोलीसांना उडविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामध्ये आतापर्यंत सहा जण गंभीर जखमी झाले असून एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त पनवेल,उरणकडून हा मार्ग जेएनपीटीला जोडला जातो. ही वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाला गव्हाणफाटा वाहतूक शाखा सुरू करावी लागली.
जेएनपीटी बंदरात उतरलेल्या कंटेनर हे सकाळी आणि रात्री भरधाव वेगाने सिंग्नल यंत्रणा तोडून पळ काढतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश सह परराज्यात जाणारे कंटेनर हे या जेएनपीटी-कंळबोली जंक्शन मार्गाने शिळफाटा, मुंब्रा मार्गाने थेट मुंबई-नाशिक आग्रा महामार्गाने पुढे जातात. तर गुजरात अहमदाबादकडे जाणारे कंटेनर हे उरणफाटा मार्गाने पनवेल ठाणे मार्गाने घोडबंदर वरून ठाणे अहमदाबाद मार्गावर रवाना होतात.
मुंबईत जाणारे पनवेल सायन महामार्गाचा वापर करतात. या सर्व महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा परिणाम थेट राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होताना दिसून येतो.
विशेष म्हणजे कंळबोली जंक्शन येथुन वाहतूक कोंडी झाल्यास ती थेट मुंब्रा बायपास, शिळफाटा ते कल्याण दुर्गोडी किल्ल्यापर्यंत पोहचते. ठाण्यात घोडबंदर मार्गावर ही त्याचा परिणाम होते.
हे ही वाचलं का?