पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेम हे आयुष्याच्या वाटेवरचे वळण असते. त्यात काही जण यशस्वी होतात तर काहींना अपयश येते. प्रेमविवाह केल्यानंतर आजही कित्येक प्रेमवीरांना निंदनीय वागणुकीचा अनुभव येतो. आता काळ बदलला असला तरी काही प्रवृत्तींमुळे प्रेमविवाह करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलेला नाही हेच सांगत प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या 'तू फक्त हो म्हण' या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटातून मोनालीसा बागल आणि निखिल वैरागर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १४ ऑक्टोबरला 'तू फक्त हो म्हण' सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
याप्रसंगी बोलताना मोनालीसा आणि निखिल सांगतात की, आमच्यात आधीपासून छान मैत्री होती त्यामुळे या चित्रपटात काम करणं आम्ही एन्जॉय केलं. प्रेमकथेच्या माध्यमातून काही सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. प्रत्येकाने हे सांगण समजून घ्यायला हवं असही या दोघांनी सांगितल. चित्रपट खूप छान झाला असून प्रत्येकाने आवर्जून हा चित्रपट पहावा असं दिग्दर्शक डॉ. गणेशकुमार पाटील, भास्कर डाबेराव आणि निर्माते किरण बळीराम चव्हाण यांनी सांगितले. या चित्रपटाला शुभेच्छा देत मी या चित्रपटासाठी गायलेलं गाणं प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास गायक आनंद शिंदे यांनी व्यक्त केला.
प्रेमासाठी त्याग, संघर्ष आणि काहीही करायची तयारी असणाऱ्या या प्रेमवीरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच प्रेम कोणतं वळण घेते? हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळं करणार? यासोबत प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोण 'तू फक्त हो म्हण' या चित्रपटात मांडण्यात आला आहे. संगीतमय प्रेमकथा असलेल्या 'तू फक्त हो म्हण' या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ. गणेशकुमार पाटील यांची आहे. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
मोनालीसा बागल, निखिल वैरागर या जोडीसोबतच 'नाळ' व 'झुंड' चित्रपटानंतर गणेश देशमुख हे एका वेगळ्या भूमिकेत 'तू फक्त हो म्हण'मध्ये दिसणार आहेत. सोबत माजी आमदार तुकाराम बीडकर, सविता हांडे, पुष्पा चौधरी, डॉ. गणेशकुमार पाटील, जोया खान, आकाश ठाकरे, रविशंकर शर्मा, भाविका निकम, राम पारस्कर, योगिनी सोळंके, परमेश्वर गुट्टे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
'तू फक्त हो म्हण' चित्रपटाची कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांचे आहेत. सुरेखा गावंडे, भास्कर डाबेराव, स्वप्नील जाधव यांनी गीते लिहिली आहेत. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जय बोरा, पूजा पाटील यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. आदित्य बेडेकर यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते रविशंकर शर्मा व राहुल चव्हाण हे आहेत. छायांकन मधुरम जे सोलंकी तर संकलन आनंद ए.सिंग यांचे आहे. रंगभूषा समीर कदम, वेशभूषा अमृता पाटील, अंजली भालेराव, अस्मिता राठोड, अभिजीत ठाकूर यांची आहे. कलादिग्दर्शन गणेश पाटोळे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश पतंगे, पंकज बोरे आहेत.