Latest

जाऊ बाई गावात : ‘आर्मी टास्क करताना हार्दिकचा हात निखळला’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जाऊ बाई गावात' या कार्यक्रमात काम करताना हार्दिक जोशीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी या कार्यक्रमाशी संबंधित त्याने आपले अनुभव सांगितले. हार्दिकला पहिल्यांदा कॉल आला तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया अशी होती की, सूत्रसंचालन आणि मी? पण नेहमी आव्हानात्मक गोष्टी करायची आवड असल्यामुळे हार्दिकने या संधीचा विचार केला. यावेळी हार्दिक म्हणाला, थोडा वेळ घेतला. मनात थोडीशी धाकधुकही होती की, प्रेक्षक मला या भूमिकेत स्वीकारतील का? पण आम्ही वर्कशॉप सुरु केलं आणि ते माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरलं. ही संधी सोडायची नव्हती कारण एक कलाकार म्हणून शब्दांचा साठा वाढला पाहिजे असं माझं मत आहे आणि संधीच सोनं करणं आपल्या हातात असतं.

संबंधित बातम्या –

'जाऊ बाई गावात' मध्ये टास्क करण्याचा अनुभव सांगताना हार्दिक म्हणाला, नुकताच आर्मी स्पेशल भाग पाहिला असेल. त्यात एक टास्क होता जो स्पर्धकांनी करायच्या आधी मी केला होता त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. तो आर्मी टास्क करताना माझा हात निखळला. तरी पण मी तो टास्क पूर्ण केला. एका सूत्रसंचालकाची भूमिका साकारताना मी कुठे कमी तर पडणार नाही ना, याची सतत मला काळजी घ्यावी लागते. इतक्या लोकांचा विश्वास, प्रेम आहे माझ्यावर आणि मी कोणालाच निराश होऊ देणार नाही. मी माझी जबाबदारी पूर्णपणे पडणार.

महाराष्ट्रात ही संकल्पना मी पहिल्यांदाच पाहिली आणि मी स्वतःला खूप नशीबवान मानतो की, मला या वेगळ्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बनायची संधी मिळाली. अभिमान आहे मला आपल्या मातीशी जोडलेलं कार्य मी करत आहे. रोज नवीन गोष्टी मला ही शिकायला मिळतात. हा कार्यक्रम किती आव्हानात्मक आहे, याविषयी सांगताना हार्दिक म्हणाला, या कार्यक्रमाचे स्पर्धक वेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीमधून आल्या आहेत त्यांनी आपलं आयुष्य खूप ऐशोआरामात जंगल आहे. त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.

हार्दिक म्हणाला, सगळेच स्पर्धक हुशार आहेत आणि प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे. त्याच्याकडे कोणत्या विषयाबद्दल माहिती कमी असेल तर मला असं वाटतं की, ती कमी पूर्ण करायला त्यांची मदत केली पाहिजे. झी मराठीने माझ्याकडून या शोची तयारी आधीपासूनच करून घेतली आहे. ५ वर्ष मी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेचं शूट कोल्हापुरात करत होतो. त्यामुळे माझी नाळ या मातीशी जोडली गेली आहे. मुळात माझ्या घरात माझ्यावरती लहानपणापासून चांगले संस्कार झाले आहेत. बालवाडीत असताना माझ्याकडून मारुती स्तोत्र, राम रक्षा पाठ करून घेतला गेला. ज्या वयात नीट वाचता ही येत नव्हतं तेव्हा आज्जीने आमच्यावर हे संस्कार करायची सुरुवात केली होती.

माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी ह्या शो मधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी 'जाऊ बाई गावातला' नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटल मध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही. कारण तिला माहिती आहे की मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिझ म्हणणे होते की जी गोष्ट आजपर्यंत नाही केली ती ह्या पुढे ही करायची नाही. हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा कि 'जाऊ बाई गावातचा' पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती या दुनियेत नव्हती.

SCROLL FOR NEXT