पुढारी ऑनलाईन : आक्षेपार्ह स्टेटसवरून कोल्हापूरात निर्माण झालेल्या हिंसक परिस्थितीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माझ्या माहितीनुसार या संघर्षात कोल्हापुरातील लोकांचा सहभाग नव्हता. तर परिस्थिती चिघळवण्यासाठी कोल्हापूरच्या बाहेरून लोकांना आणले होते, असे वक्तव्य केले होते. यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बुधवारी (दि.०७ जून) जी घटना घडली ती, लोकांच्यातून आलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. कोल्हापूरकरांना बाहेरून लोकं (Kolhapur News) आणण्याची गरज नाही' अशा शब्दांत माने यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
खासदार धैर्यशील माने (Kolhapur News) पुढे म्हणाले, कोल्हापुरात बाहेरून लोकांना बोलावण्याची गरज नाही हे संजय राऊत यांना माहीत नाही. जर एखाद्याने कोल्हापूर करांच्या स्वाभिमानाशी खेळण्याचा प्रयत्न केला, तर ते त्यांच्या पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देतात. बुधवारी (दि.०९ जून) कोल्हापूरात घडलेली घटना ही येथील लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे, विविध पक्षांतील लोक तेथे होते, असे मत माने यांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊत सध्या ज्या युतीचा भाग आहेत, त्यांना शिंदे फडणवीस सरकारने केलेले नामांतरण पचनी पडलेले नाही. त्यांचे मित्रपक्ष आजही त्यांच्या भाषणात छत्रपती संभाजीनगर म्हणत नाहीत, तर औरंगाबाद म्हणतात. त्यामुळे ते कोणती विचारधारा बाळगतात याचा खुलासा राऊत यांनी करावा, असा उल्लेख देखील खासदार धैर्यशील माने (Kolhapur News) यांनी यावेळी केला आहे.
आक्षेपार्ह स्टेटसवरून कोल्हापूरात बुधवारी (दि. ७ जून) तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. जमावाने काही प्रमाणात दगडफेकही केली. यानंतर पोलिसांनी सौम्य लाटीचार्ज केला. दरम्यान शहरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती. यानंतर हळूहळू कोल्हापूर पूर्ववत होत असताना दिसत आहे. तसेच आज इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली.