Latest

Kolhapur Rain Update : कोल्हापूर- पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच; ७५ बंधारे पाण्याखाली

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून पंचगंगेने काल रात्री 10 वाजता इशारा पातळी गाठली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणांच्या पाणी पातळीतही वाढ सुरूच आहे. आज  सकाळी (बुधवार, दि.१०) सहा वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी ३९ फूट ८ इतकी होती. (Kolhapur rain Update) पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. सोमवारी प्रचंड वेगाने वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीने कोल्हापूरवासीयांना धडकीच भरली होती. जिल्ह्यातील एकूण ७१ बंधारे पाण्याखालील गेले आहेत. यामुळे जिल्ह्याला महापुराचा धोका कायम आहे. त्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळी ११ वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ४० फूट ०३ इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. एकूण पाण्याखालील बंधारे  ७५ आहेत

सकाळी ९ वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ४० फूट ०१ इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. एकूण पाण्याखालील बंधारे  ७४ आहेत. 

Kolhapur rain Update : 71 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील 14 नद्यांवरील 71 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वेदगंगा व कासारी नदीवरील प्रत्येकी नऊ, वारणा नदीवरील आठ, पंचगंगा नदीवरील सात, भोगवती, कुंभी व कडवी नदीवरील प्रत्येकी सहा, दूधगंगा, घटप्रभा आणि हिरण्यकेशी या नद्यांवरील प्रत्येकी चार, ताम्रपर्णी नदीवरील तीन, तुळशी आणि धामणी नदीवरील प्रत्येकी दोन, तर चिकोत्रा नदीवरील एक बंधारा पाण्याखाली असल्याने त्यावरील वाहतूक बंद आहे. या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. सोमवारी प्रचंड वेगाने वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीने कोल्हापूरवासीयांना धडकीच भरली होती. सोमवारी सकाळी सात वाजता पंचगंगेची पातळी 24 फूट होती. मंगळवारी रात्री दहा वाजता ती 39 फुटांवर गेली.

राधानगरी धरणाचा स्‍वयंचलित दरवाजा क्रं ६ उघडला

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्‍या चार दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने काल मंगळवारी धरण ९८ टक्‍के भरले होते. त्‍यामुळे कोणत्‍याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्‍यता होती. दरम्‍यान धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्‍याने आज सकाळी राधानगरी धरणाचा ६ व्या क्रमांकाचा स्‍वयंचलित दरवाजा उघडला. यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग 1428 तर पॉवर हाऊसमधून 1600 क्‍यूसेक्‍स असा एकूण 3028 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली.

दरम्‍यान कोल्‍हापुरातील सुतारवाडा येथील नागरिकांना पुराचे पाणी वाढत असल्‍याने सुरक्षेच्या कारणास्‍तव चित्रदुर्ग मठ येथे रात्री 1.00 वाजण्याच्या सुमारास हलविण्यात आले आहे. यामध्ये १६ कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबातील व्यक्‍तींची संख्या ६० इतकी आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT