पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. या हिंसाचारप्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करावी,अशी मागणी करणारी याचिका वकील अमृतपाल सिंह खालसा यांनी दाखल केली आहे.
या याचिकेत म्हटलं आहे की, दिल्लीत २०२० मध्ये दंगल झाली होती. यावेळी न्यायालयाने दंगल रोखता आली नाही म्हणून दिल्ली पोलिसांना फटकारले होते. पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. दिल्ली पोलिसांनी आजपर्यंत दंगलीचा केलेला तपास हा पक्षपात करणार आहे. दंगली घडवून आणणार्यांचा बचाव करणार आहे, असाही आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने स्वतंत्र चाैकशीचे आदेश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोन संशयित आरोपी हे अल्पवयीन आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी १० टीम स्थापन केल्या आहेत. तसेच जहांगीरपूर परिसराती केंद्रीय राखीव पाेलीस दल ( सीआरपीएफ) आणि 'आरएएफ'च्या पाच अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी रविवारी १४ जणांना अटक करण्यात आली होती. याला १२ जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये दंगलीत गोळीबार करणारा अस्लम याचाही समावेश आहे.
जहांगीरपुरी हिंसाचारात आठ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताला गोळी लागली आहे. रविवारी या हिंसाचाराचे काही व्हिडीओ समोर आले. परिसरातील २०० हून अधिक सीसीटीव्हीची फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरुन तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त उषा रंगनानी यांनी दिली. परिसरात शांतता असून पोलिस शांतता समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :